अधिकाऱयांची उपस्थिती : ऍपद्वारे नावनोंदणी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिकेच्यावतीनेही मतदार याद्यांसंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. किल्ला येथील कमलबस्ती येथे या जनजागृती फेरीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते याला चालना देण्यात आली. किल्ल्यासह बेळगाव शहरामध्ये काही भागामध्ये सायकलवरून फेरी काढण्यात आली. यावेळी या फेरीमध्ये विविध अधिकाऱयांनी भाग घेतला होता. मतदार याद्यांमध्ये नोंद करण्यासाठी मतदार हेल्पलाईन ऍपच्याद्वारे नोंद करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाला सर्वात अधिक महत्त्व दिले पाहिजे. कारण त्यावरच देशाचे हीत अवलंबून असते. त्यामुळे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नावे दाखल करण्यासाठी पुढे आले पाहिजे. मतदार यादीत नाव दाखल झाल्यानंतर मतदानाचा हक्कही बजावला पाहिजे. आपण या देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे प्रत्येकाने हे कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
एप्रिल 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच मतदार याद्यांमध्ये नाव नोंदवून घेण्याबाबत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कामाला सुरुवात झाली आहे. मतदार याद्यांमध्ये नोंद झाल्यानंतर मतदार कार्ड हे आधारला जोडले जात आहे. जवळपास 80 टक्के मतदारांनी आधारजोडणी केली आहे. मात्र अजूनही 20 टक्के मतदारांनी आधारला जोडणी केली नाही. त्यासाठी अजूनही वेळ वाढवून देण्यात आला आहे. तेंव्हा आधार जोडणीसाठीही मतदारांनी पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
मतदारांना हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नावामध्ये दुरुस्ती करायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र अर्ज देखील उपलब्ध आहेत. तेंव्हा ऍपद्वारे किंवा अर्ज केल्यास संबंधितांच्या नावाची नोंद तसेच इतर दुरुस्ती देखील केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
किल्ला येथून किल्ला तलाव, आरटीओ सर्कल आदी परिसरात सायकल फेरी काढण्यात आली. या सायकल फेरीमध्ये महापालिकेचे आयुक्त रुदेश घाळी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ, मनपा उपायुक्त श्रीदेवी हुग्गी, पिडीओ वासुदेव ऐर्किक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.