परीक्षा शुल्कात तब्बल 25 टक्क्यांनी वाढ केल्याच्या विरोधात अभाविपचे विद्यापीठासमोर आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयू) परीक्षा शुल्कात तब्बल 25 टक्क्यांनी वाढ केल्याच्या विरोधात मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने (अभाविप) विद्यापीठासमोर आंदोलन केले. आंदोलन केल्याने संतापलेल्या व्हीटीयूच्या कुलगुरुंनी विद्यार्थ्यांवरच अरेरावी केली. ‘तुम्हाला विद्यापीठात प्रवेश कोणी दिला?’ असे म्हणत हाकलून देण्याच्या सूचना केल्याने विद्यार्थी व कुलगुरुंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. कुलगुरुंच्या या वागण्याने विद्यापीठाच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचला आहे.
व्हीटीयूने पदवी व पदव्युत्तर अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुल्कात 25 टक्क्यांनी वाढ केल्याचे जाहीर केले. तर उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन शुल्कातही वाढ केल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात मंगळवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन केले. विद्यापीठाने वाढीव शुल्काचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
घोषणाबाजी ऐकताच संतापलेल्या कुलगुरुंनी विद्यार्थ्यांवर अरेरावी केली. इथून निघून न गेल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. यामुळे कार्यकर्ते व कुलगुरुंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अखेर पोलीस व विद्यापीठाचे रजिस्ट्रार अण्णीगेरी यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. नूतन कुलगुरुंच्या या वागण्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे. किमान कुलगुरुंनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून निवेदन तरी स्वीकारणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.
अरेरावी केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
व्हीटीयूने परीक्षा शुल्कात वाढ केल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. याविरोधात कार्यकर्त्यांसह आंदोलन छेडले असताना कुलगुरुंनी कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली. मागण्या कोणत्या आहेत अथवा निवेदन न स्वीकारताच अरेरावी सुरू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
– रोहित हुमणाबादीमठ (अभाविप सचिव)