सामाजिक सुरक्षा योजना लाभार्थींचीही आर्थिक ओढाताण
प्रतिनिधी / पणजी
आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक लाडली लक्ष्मींचे विवाह होऊन त्यांच्या घरी लाडली लक्ष्मी जन्मल्या तरीही योजनेचा लाभ त्यांना मिळला नाही, अशी टीका आम आदमी पक्षाच्या महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे.
गुरुवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लाडली लक्ष्मी सारखाच प्रकार दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबत घडला असून वयोवृद्ध, विधवा आणि अपंग व्यक्तींना गेल्या चार महिन्यांपासून त्यांची आर्थिक मदत मिळालेली नाही. या प्रकारास समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई जबाबदार आहेत, असा आरोप कुतिन्हो यांनी केला आहे.
अंत्योदय तत्वाचे पालन करणाऱया भाजप सरकारकडे शपथविधी सोहळय़ावर खर्च करण्यासाठी कोटय़वधी रुपये आहेत. शपथविधी, सरकार तुमच्या दारी, निवडणूक प्रचार अशा विविध कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठीही भरपूर पैसा आहे. एवढेच नव्हे तर अमित शहा यांना 850 रुपये किंमतीचे पाणी देण्यासाठी सुद्धा पैसे आहेत. परंतु गरीब लाभधारकांना मासिक मदत देण्यासाठी पैसे नाहीत, असा आरोपही कुतिन्हो यांनी केला.
या योजनेंतर्गत दरमहा सुमारे 1.37 लाख लोकांना लाभ मिळतो. त्यात 12 हजार लाभार्थी एक तर विविध शारीरिक व्याधींनी पीडित किंवा दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांना औषधोपचार आणि अन्य गरजा भागविण्यासाठी या योजनेवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे. अशावेळी पैसे वेळेवर मिळत नसल्याने त्यांची त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यांची चार महिन्यांची थकित आर्थिक मदत त्वरित वितरित करण्यात यावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली आहे.
दरम्यान, आर्थिक मदत वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी विविध सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर मंत्री फळदेसाई यांनी, सरकार लवकरच मासिक रक्कम वितरित करेल, अशी हमी दिली होती. मात्र त्या आश्वासनानंतर केवळ एक महिन्याचीच रक्कम लाभधारकांच्या खात्यात पोहोचली आहे, असे कुतिन्हो म्हणाल्या.
कोविड कालावधीत, महिला आणि बाल विभागाला लाडली लक्ष्मी योजनेसाठी एकूण 1,04,218 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 74,186 मंजूर झाले आहेत आणि 19471 सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय, 1,91,838 गृह आधर योजनेचे अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 1,65,724 मंजूर झाले आहेत आणि 12,658 मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय, लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत 2018 पासूनची थकबाकी आहे. या योजनेच्या पैशांच्या प्रतीक्षेत अनेकांचे विवाह होऊन त्या स्वतः माता बनल्या. परंतु, अद्याप पैसे हाती पडलेले नाहीत, असे कुतिन्हो यांनी सांगितले.