करमळीतील ग्रामस्थ, वाहनचालकांचा संबंधितांना सवाल
प्रतिनिधी /तिसवाडी
करमळी पंचायत क्षेत्रातील एकावाडा येथील मुख्य रस्त्यावर वीज वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेला चर व्यवस्थित न बुजविल्याने दुचाकीसह चारचाकी वाहनांनाही धोकादायक बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तसाच असून त्याठिकाणी काही दुचाकीचालक पडले असून चारचाकी वाहनांचेही बंपर तुटून पडण्याच्या घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
एकावाडा येथील हॉटेल विल्शासमोर हा चर खोदण्यात आला आहे. हे ठिकाण म्हणजे एका बाजूने उतरण त्याचबरोबर वळणही आहे. ओल्ड गोवा येथून करमळी पेठेर, आजोशी, मंडूर, नेवरा, पिलारपर्यंत जाणारी वाहने याच ठिकाणावरुन जातात. त्याबरोबरोबर वरील ठिकाणांहून येणारी वाहन याच ठिकाणावरुन एकतर करमळीकडे जातात किंवा ओल्ड गोव्याच्या दिशेने जातात. अशा खूप वर्दळीच्या ठिकाणी हा धोकादायक चर आहे.
वीज खात्याने वीज वाहिनी नेण्यासाठी हा रस्ता खोदला, परंतु त्यावर अजूनही डांबर किंवा काँक्रीट घातलेले नाही. गेले दहा-बारा दिवस हा धोकादायक खेळ सुरु असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले. अपघात होऊन पडणाऱया वाहनचालकांच्या मदतीला स्थानिक लोक धाऊन जातात. मात्र रात्रीच्या वेळी अधिक धोका असतो. या धोक्यासंदर्भात संबंधितांना कळवूनही त्यावर उपयायोजना केली जात नाही. संबंधीत खाती तेथे एखादा गंभीर आपघात होऊन बळी जाण्याची वाट पाहत आहेत काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.