पाऊस गेल्यानंतरही कोकणातील इंदापूर ते झाराप या 366 कि. मी.च्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गातील काही टप्प्यांमध्ये चौपदरीकरणाला अजूनही सुरूवात झालेली नाही. चौपदरीकरण लवकर पूर्ण करण्याची सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार कंपन्यांची मानसिकताच दिसत नाही. यातील चौपदरीकरणाचे काही टप्पे तर 50 टक्क्यांच्या आसपासच रखडलेले आहेत. संगमेश्वर, रत्नागिरी 20 टक्क्यांच्याही खाली आहे. त्यामुळे डिसेंबर 23 पर्यंतही चौपदरीकरण पूर्ण होणे अशक्य दिसत आहे. वेगाने काम झाले तरीही अजून किमान दोन वर्षे हे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा हा 450 किलोमीटरचा महामार्ग आहे. यामध्ये इंदापूर ते झाराप या 366 किलोमीटरच्या चौपदरीकरणाला 2013 साली प्रशासकीय मंजुरी मिळाली. प्रारंभी 11 हजार 745 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात 2014 मध्ये भूसंपादनाला सुरुवात झाली. कार्यारंभ आदेश 2017-18 मध्ये देण्यात आले. काम वेगाने व्हावे या हेतूने 35 ते 40 कि.मी. अंतराचे टप्पे करून वेगवेगळया कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिह्यात कशेडी बोगदा सोडून एकूण दहा टप्प्यांमध्ये काम सुरू करण्यात आले.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्हय़ांतील अकरा टप्यांपैकी चार टप्पेच पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. रायगडमधील इंदापूर ते वडपाले या 26.75 कि. मी.मध्ये 44.90 टक्के, वडपाले ते भोगाव खुर्द या 38.76 कि. मी. अंतरात 67.12 टक्के, भोगाव खुर्द ते कशेडी या 8.975 कि. मी.च्या टप्प्यात 64.41 टक्के, कशेडी ते परशुराम या 42.33 कि. मी.च्या टप्प्यात 86.02 टक्के, परशुराम घाट ते आरवली या 34.45 कि. मी. दरम्यान 60.02 टक्के, आरवली ते तळेकांटे या 39.23 कि.मी.मध्ये 19.20 टक्के, तळेकांटे ते वाकेड या 49.15 कि. मी.च्या टप्प्यात 21.67 टक्के काम झाले आहे. वाकेड ते तळगांव व पुढे कळमट आणि झाराप हे तीनही टप्पे पूर्णत्वास गेलेले आहेत.
एकीकडे राजापूर, खेडसह सिंधुदुर्गमधील दोन्ही टप्पे पूर्ण होत आलेले असतानाच कामांचा खरा खोळंबा रत्नागिरी जिल्हय़ातच झालेला पहावयास मिळत आहे. या संपूर्ण चौपदरीकरणात संगमेश्वरमधील आरवली ते तळेकांटे आणि पुढे वाकेड हे दोन टप्पे सर्वात पिछाडीवर आहेत. गेल्या सहा वर्षात या दोन्ही टप्प्यांमध्ये जेमतेम 20 टक्केच काम झाले आहे. सिंधुदुर्गसह अन्य भागात चौपदरीकरणातील सुशोभिकरणाची झाडे उगवली तरीही संगमेश्वर टप्प्यात अजून पहिलीच झाडे तोडायची आहेत. प्रारंभी या टप्प्याचे काम मे. एम.ई.पी. करत होती. मात्र काम सुरू केल्यानंतर त्यांनी पुढे कामच सोडून दिले. आता येथे दोन्ही ठिकाणी नवीन कंत्राटदार कंपनी काम करत आहे. मात्र पाऊस संपल्यानंतर अजूनही या टप्प्यात कामाला सुरूवात झालेली नाही.
कोकणात चौपदरीकरणाला सहा वर्षापूर्वी सुरूवात झाली. मात्र अजूनही ते पूर्णच नव्हे तर 50 टक्केही झालेले दिसत नाही. चौपदरीकरण रखडण्याची अनेक कारणे आहेत. चौपदरीकरणासाठी कंपन्यांनी रस्त्यावर काम सुरू केले. त्यावेळी स्थानिक पातळीवरची कामे काही नेत्यांच्या हस्तक्षेपाने राजकीय मंडळींकडे गेली. अनेक राजकीय नेते त्यामध्ये गुंतल्याचे यापूर्वीच पुढे आले आहे. सुरूवातीपासूनच डोंगर, माती खोदाईची कामे स्थानिक स्तरावर वाटली गेली. त्यानंतर पाणी योजना, वीजवाहिनींचे स्थलांतर, टंकरने पाणीपुरवठा, वृक्षतोड, जेसीबीसह अन्य यंत्रसामुग्रीही अनेकांनी पहिल्या टप्प्यात पुरवली. राजकीय शिरकावामुळे सुरूवातीचे काम संथगतीने झाल्याचा आरोप आजही होत आहे. शिवाय सुरूवातीच्या टप्प्यात कामे संथगतीने होत असताना आणि जनतेचा रोष वाढत असतानाही एकही राजकीय नेता, जबाबदार लोकप्रतिनिधी यावर चकार शब्दही काढत नव्हता. केवळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणे, पायऱयांवर बसून फलक फडकावणे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवणे याव्यतिरिक्त फारसे कुणी काही करताना दिसत नव्हते. जिल्हा प्रशासनाबरोबर आढावा घेतानाही तितक्या तीव्रतेने कंत्राटदार कंपन्यांना जाब विचारताना कधी कुणी दिसले नाही. नाही म्हणायला यावर्षी महामार्गावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी आंदोलन केले. मात्र नंतर तो फार्स पोटठेकेदारांच्या अडकलेल्या बिलांसाठी झाल्याचा आरोप केला जात होता.
महामार्गावर एकूण 14 मोठय़ा पुलांपैकी राजापूर पुलाचे काम वगळण्यात आलेले असून चार पुलांची कामे पूर्णत्वास गेली असून उर्वरीत 9 पुलांची कामे सुरू आहेत. यातील काही पुलांच्या बांधकामाना दिलेली मुदत केव्हाच टळून गेली आहे. चिपळुणात तब्बल 1.835 कि.मी. लांबीचा, 25 मीटर रूंदीचा आणि दोन अबार्टमेंटरसह 46 पिलरवर उभा राहणारा उड्डाणपूल कोकणातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल असेल. या पुलाचे काम वेगाने सुरू असले तरी तो पूर्ण होण्यासाठी अजूनही किमान दीड वर्षे लागणार आहेत.
सर्वच टप्प्यांची मुदत 22 मध्येच टळून गेली
इंदापूर ते झाराप या 366 कि.मी.च्या चौपदरीकरणातील अकराही टप्प्यांच्या कामांना 2017-मध्ये सुरूवात झाली. त्यानंतर अलीकडची दीड, दोन वर्षे कोरोना लॉकडॉऊनमध्ये गेली. मात्र कामे संथगतीने झाल्यानंतर प्रत्येक कंत्राटदार कंपनीला मुदतवाढ मिळाली. मात्र त्याही कालावधीत ते काम पूर्ण करू शकले नाहीत. आता बहुतांशी कंत्राटदार कंपन्यांना दिलेली मुदत या आर्थिक वर्षातच मार्च, जून आणि डिसेंबर महिन्यात संपली आहे. सध्याची स्थिती पाहता आणखी मुदतवाढ देऊनही वर्षभरात ही कामे पूर्ण होणे अशक्य वाटते. चिपळुणातील उड्डाणपूल वगळून उर्वरीत काम तसेच कशेडी आणि रायगडमधील व कशेडी बोगद्यातील कामे वर्षभरात पूर्णत्वास जातील. मात्र संगमेश्वर व रत्नागिरीतील कामे डिसेंबर 23 पर्यंतही पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही.
नव्या वर्षात कशेडी बोगद्यातून प्रवास
खेड तालुक्यातील कशेडी घाटाला पर्याय म्हणून दोन्ही बोगद्यांची खोदाई पूर्ण करत संपूर्ण 9 कि. मी. अंतरातील पूल, मोऱयांच्या कामांसह बोगदा पूर्णत्वाच्या उंबरठय़ावर पोचला आहे. सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले असून केवळ रस्ते कॉंक्रिटीकरण शिल्लक आहे. तब्बल 441 कोटी खर्चाच्या या टप्प्यातील तीनपदरी रस्ता येत्या मार्चअखेर खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या वर्षात बोगद्यातून प्रवास करता येणार आहे. यामुळे 25 मिनिटांच्या वेळेची बचत व घाटातील धोक्याच्या प्रवासाला पूर्णविराम मिळणार आहे.
राजेंद्र शिंदे