दिल्लीचा युवक बेळगावात दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
देशात रक्तदानाविषयी जागृती नसल्यामुळे रक्ताचा पुरवठा न झाल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे देशात रक्तदानाविषयी जागृती करण्यासाठी दिल्ली येथील एक तरुण पायी देशभ्रमंती करीत आहे. केवळ पदभ्रमंतीच नाहीतर जागोजागी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून युवापिढीला महाविद्यालयांमध्ये जावून मार्गदर्शन करीत आहे. सोमवारी हा तरुण बेळगावात दाखल झाला असून रक्तदानाविषयी जागृती केली.
दिल्ली येथील किरण वर्मा या 37 वषीय तरुणाने 28 डिसेंबर 2021 पासून केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथून पायी पदभ्रमंतीला सुरुवात केली. देशात वर्षाला अंदाजे 1.5 कोटी रुग्णांना रक्ताची गरज भासते. यापैकी 1 कोटी रुग्णांना रक्त उपलब्ध होते. उर्वरित रुग्ण रक्त उपलब्ध न झाल्याने दगावतात. देशात रक्तदानाविषयी असलेली चुकीची मानसिकता दूर करून जागृती व्हावी या उद्देशाने देशभर पायी फिरण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. केरळ येथून सुरू झालेल्या या प्रवासात तामिळनाडू, कर्नाटक, गोवा व यापुढे महाराष्ट्र असा प्रवास होणार आहे. दररोज 30 ते 40 कि. मी. प्रवास करत किरण रोज नव्या शहरात जागृती करतात. एकूण 21 हजार कि. मी. हा प्रवास आहे.त्यापैकी 3 हजार कि. मी.चा प्रवास पूर्ण केला आहे. किरण हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांच्या पत्नी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. ज्या गावात जातात तेथील आहाराचा ते आस्वाद घेतात. कुमठा येथे आहारातील बदलामुळे आरोग्याची समस्या जाणवली. त्यामुळे जवळच असणाऱया पणजीत उपचार घ्यावे लागले. यापुढे ते कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई प्रवास करणार आहेत.