पावसाळा म्हंटल की चिंबचिंब भिजायला कोणाला आवडत नाही. मग पाऊस सुरु होताच आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळणारे धबधबे,हिरव्यागार डोंगरावरून हळुवार सरकणारे दाट ढग,त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवण्यासाठी आपली पाऊले आपोआप घराबाहेर पडतात.पण पावसाळी सहलीसाठी कुठे लांब जाण्याची काहीच गरज नाही कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातच अशी अनेक पावसाळी पर्यटन स्थळे आहेत जिथं आपल्याला पावसाचा मनमुराद आनंद लुटता येतो चला तर पाहुयात ही स्थळे कोणती आहेत.
१. राधानगरी
कोल्हापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर हिरवाईने नटलेला राधानगरी तालुका आहे.हा तालुका जलाशययुक्त असल्याने याला धरणाचा तालुका म्हणून देखील संबोधले जाते. दरवर्षी पावसाळ्यात या तालुक्यातील राऊतवाडी ,रामणवाडी, हसणे, सोळांकूर, गैबी दरम्यान असणाऱ्या छोट्या-छोट्या धबधब्यांवर पर्यटकांची अफाट गर्दी होत असते.हिरवागार डोंगर आणि पावसाच्या धारा यांचा मानमूरादव आनंद इथे घेता येतो. याच तालुक्यातील दाजीपूर अभयारण्यावरील कोकण पॉईंटवरून दिसणारे सौंदर्य, दाट धुके, ढग जमिनीवर उतरल्याचा भास होणारे दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते. येथे जाण्यास एस. टी बसेसची भरपूर सुविधा आहे.
२. राऊतवाडी
राधानगरी मधून अवघ्या साडेसहा किलोमीटर राऊतवाडी धबधबा आहे.सतत पाऊस सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा धबधबा चालू होतो. पर्यटकांची ये-जा चालू होते. या धबधब्याची उंची दीडशे फूट आहे. एवढ्या उंचावरून पडणारे पाण्याचे दृश्य डोळ्याचं पारणं फेडतं. दरवर्षी या ठिकाणी लाखो पर्यटक येत असतात आणि पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटतात.
३. फोंडा घाट धबधबा
दाजीपूर जवळील घाटातील हा धबधबा ही पर्यटकांचे आकर्षण आहे. वन खात्याने केलेल्या सुविधांमुळे पर्यटकांना याचा आनंद घेता येतो.पावसाळ्यात या घाटाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते.
४.गगनबावडा
कोल्हापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गगनबावडा तालुक्याला पावसाचे माहेरघर ओळखलं जातं.येथून करूळ व भुईबावडा हे दोन घाट कोकणात मार्गक्रमण करतात. या घाटाचे सृष्टीसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत. नागमोडी वळणे घेत जाणारे घाटरस्ते व घाटातून झुळझूळ वाहत नदीत पडणारे पाण्याचे प्रवाह पाहून पर्यटक क्षणभर थक्क होतो. गगनगडावरून संपूर्ण घाटातील दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.
५. रामलिंग
कोल्हापूर शहरापासून ४२ कि. मी. अंतरावर गगनबावडा रोडवर पळसंबे गावापासून दक्षिणेकडे ३ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.पावसाळ्यात आकर्षक धबधबा, हिवाळ्यात धुके, उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण अशा तिन्ही ऋतूमध्ये निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण बनले आहे.या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेले एकाच शिळेमध्ये कोरलेले वैशिष्टपूर्ण मंदिर आहे .येथील गुहेमध्ये एक शिवलिंग आहे. या शिवलिंगावर डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा तिन्ही ऋतूंमध्ये अभिषेक होत असतो.रामलिंगचा धबधबा सुरक्षित आणि पावित्र्य जपलेला असा आहे. हा धबधबा ८-१० फुटांवरून कोसळत असल्याने पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.
६. पन्हाळा
कोल्हापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर पन्हाळागड आहे.कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पावसाळ्यात या ठिकाणी आल्हाददायक वातावरण असते.म्हणूनच पावसाळा सुरु होताच अनेक पर्यटक पन्हाळ्यावर येतात.गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत.एक दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे.
७. बर्की
‘बर्की’ हे ठिकाण कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर आहे. कळे-बाजारभोगाव, करंजफेण मार्गे या ठिकाणी जाता येते. तर मलकापूर-येळवणजुगाई मार्गेही जाता येते. गावाच्या सर्व बाजूंनी उंचच्या उंच पर्वतरांगा आहेत.धबधब्याकडे जाण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर पुढे पायपीट करावी लागते. धबधबक्याकडे जाताना हिरवे डोंगर, जलाशय, खळखळणारे ओढे, डोलणारी झाडे, फुले, पक्षी, डोंगरातून कोसळणारे प्रवाह अशी निसर्गाची उधळण अनुभवायास मिळते.धबधब्याच्या मार्गावरच आता जलाशय बांधला असून, याठिकाणी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. २० फूट रुंदीच्या पात्रातून सुमारे ४०० फुटांवरून कोसळतो. मुख्य धबधब्याच्या आजूबाजूला आणखी चार धबधबे आहेत.
८. स्वप्नवेल
कोल्हापूरहून जाण्यासाठी १४0 किलोमीटर अंतरावरअसलेला महाराष्ट्र-कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला, चंदगड तालुक्यातील तिलारीनगरनजीक असलेला स्वप्नवेल पॉईंट. परिसरात राहण्याची सोय आहे. येथे स्वप्नवेल पॉईंटसह पारगड, रातोबा, ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, सर्च पॉईंट,मोर्लेचा दुर्गोबा धबधबा आणि तिलारीचा तुडुंब भरलेला जलविद्युत प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालतोय. पारगडच्या पायथ्यापासून नागमोडी वळणे घेत जाताना जंगली प्राणी, निरनिराळे खेकडे, देवाच्या गायी, थुई-थुई नाचणारे मोर, वानरं, ससे, हत्ती, रानडुकरे, सांबर, गवे व निरनिराळे पक्षी व प्राण्यांचे दर्शन होते. चुकून एखादेवेळी झालेले सूर्यदर्शन, मध्येच येणारे धुके मनाला अल्हाददायक वाटते. येथून दिसणारा गोव्याचा अथांग महासागर व विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते. रस्ते आणि पर्यटनाचा विकास झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे.
९. आंबा घाट
कोल्हापूर-रत्नागिरीच्या जिल्ह्यांची सीमा सजवलेला तेरा किलोमीटरचा नागमोडी आंबाघाट, आंबा-विशाळगड व केंबुणेर्वाडी ते पावनखिंड हा जंगल, इतिहासाची साद घालणारी वनराई, केर्लेचा धबधबा, मानोली धरणाच्या सांडव्याने घेतलेले प्रशस्त धबधब्याचे रूप, गेळवडे धरणाचा झाडीत विसावलेला बारा किलोमीटरचा बॅक वॉटर व्हू, बर्की, पांढरेपाणी ही वर्षा पर्यटनाला हाकणारी स्थळे सर्वांनाच भुरळ घालतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून कोल्हापूर,कोकण व पुणे, मुंबई भागातील हौशी मंडळी येथील शहारणारा पाऊस एन्जॉय करण्यास गर्दी करीत आहेत.भर पावसातील पावनखिंडीची वारी तर राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे.
१०. रामतीर्थ
कोल्हापूरपासून १00 किमी अंतरावर आणि आजरा तालुक्यापासून फकत दोन कि़मी अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळी नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण पाहायला मिळते.हिरण्यकेशीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे ठिकाण येथे असलेल्या धबधब्यामुळे प्रसिद्ध आहे.असं म्हणतात कि वनवासात असताना रामाने इथे काही काळ वास्तव्य केले होते म्हणून या स्थळाला रामतीर्थ असं म्हंटल जातं.या ठिकाणी भगवान रामाचं मंदिर आहे. मंदिरासभोवतालचा परिसर देखील सुंदर आहे.पावसाळ्यात महाराष्ट्रातून येथे अनेक पर्यटक या स्थळाला भेट देतात.