ऑनलाईन टीम/तरुण भारत
हवामान विभागाने (IMD) राज्यात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rainfall Alert) दिला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. ज्या-ज्या भागात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्या भागात तातडीनं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) टीम तैनात करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम आणि सर्व जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला अलर्टवर राहण्याच्या सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
मुंबई, ठाणे शहरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच माथेरान आणि रायगड परिसरालाही पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला रविवार ११ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर राज्याच्या काही भागात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते. दरम्यान, पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनानं आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावं अशी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली.
हे ही वाचा : बोरगाव भागात पावसाचे रौद्ररूप; शेतीपिकांचे मोठे नुकसान
सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा
सध्या महाराष्ट्रासह दक्षिणेकडील काही राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज राहावं अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहेत. या सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्री म्हणाले. आजपासून राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.