ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘हर हर महादेव’आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून इतिहासाचा गाभा मोडून चित्रपट बनवायचे का? असा सवाल उपस्थित करत इतिहासाची मोडतोड कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना दिला आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले, ऐतिहासिक चित्रपट निघत आहेत ते कौतुकास्पद आहे. पण चित्रपटाच्या स्वातंत्र्यानुसार इतिहासातील घडामोडींची मोडतोड केली जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव हा चित्रपटात इतिहासाची प्रचंड मोडतोड करण्यात आली आहे. लोकांना आवडतं म्हणून इतिहासाचा विपर्यास करून चित्रपट पुढे आणायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव म्हणतात आणि इतिहासाचा विपर्यास करायचा?’, असा सवाल त्यांनी केला.
अधिक वाचा : आयुष मंत्रालयाची विश्वासार्हता जागतिक पातळीवर
तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचा पोश्टर बघा. मावळ्यांचे पोषाख पाहा. हे काय मावळे आहेत का?’ हा इतिहासाचा विपर्यास नाही का? या चित्रपटासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले होते. मी सगळय़ा निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना इशारा देतो, असा चुकीचा इतिहास पुढे आणत असाल गाठ माझ्याशी आहे. मी स्वतः त्याला आडवा येणार. माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी.’ अशी मागणीही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.