प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कारखान्यातील सांडपाणी थेट असगणी येथील ओढय़ात सोडण्यात येत असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत दूषित झाले. रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले असून पाळीव जनावरांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून सांडपाणी सोडणाऱया कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदार पावसातील वाहत्या पाण्याची संधी साधत सांडपाणी थेट नाल्यात किंवा ओढय़ात सोडत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. या सांडपाण्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत दूषित होऊन हेच पाणी भातशेतीतही मिसळत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. मध्यरात्री पाऊस पडल्याची संधी साधत एका कंपनीतून सांडपाणी थेट नाल्यात सोडण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सातत्याने तक्रारी करूनदेखील कारवाईसाठी पुढाकार घेतला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सामुदायिक सांडपाणी प्रकल्पात पाठवणे आवश्यक आहे. तेथे सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी जलवाहिनीद्वारे सोडावयाचे आहे. मात्र नाल्यात किंवा ओढय़ात सांडपाणी सोडून ग्रामस्थांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
कारवाई न झाल्यास आक्रमक ः फडकले
रासायनिक सांडपाणी नाल्यात किंवा ओढय़ात सोडणाऱया कारखान्यांवर कारवाई केली जात नसल्यामुळेच कारखानदारांचे फावत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही बाब गांभीर्याने घेऊन कारखानदारांवर कठोर कारवाई न केल्यास आक्रमकतेचा अवलंब करावा लागेल, असा इशारा असगणीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप फडकले यांनी दिला आहे.