नवारस्ता/प्रतिनिधी
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने पाणी साठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळे आज बुधवारी सायंकाळी ५ वाजता कोयना धरण पायथा विद्युत गृहामधून १,०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्याची शक्यता वाढली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना गेल्या २४ तासात पावसाने झोडपून काढले आहे. तर हवनं विभागाने मुंबईत, नाशिक आणि पुण्याला ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात मुसध्रा पाऊस सुरुच आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा इशारा दिल्याने जोरदार सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे.