रत्नागिरी/प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे सोमवारी काजळी नदीचे पाणी चांदेराई बाजारपेठेत घुसले. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली. पण अजूनही हे पाणी बाजारपेठेतुन न ओसरल्याने त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सोमवारी 8 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता बाजारपेठेत काजळी नदीच्या पुराचे पाणी घुसले. पण आज 9 ऑगस्ट ला सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे 24 तासांनंतरही पाणी बाजारपेठेत होते.
चांदेराई सहित हरचेरी., सोमेश्वर , ताेनदे , हातीस या भागात पुराचे पाणी शिरले होते. सोमवारी रात्री पासून विद्युत प्रवाह देखील या परिसरात खंडित झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरचा चिखल दूर करण्यासाठी जरूर ती उपाय योजना करावी व या घटनेचे तात्काळ पंचनामे करून पूरग्रस्तांना तात्काळ शासनाने मदत द्यावी अशी आग्रही मागणी चांदेराई चे माजी सरपंच दादा दळी यांनी केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचे पाणी या बाजारपेठेत व बाजारपेठे शेजारी लोक वस्तीत जाते.ही समस्या कायम स्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाय योजना न केल्याने दरवर्षी ग्रामस्थांना या परिस्थितीला समोरे जावे लागत असल्याची नाराजी चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनी व्यक्त केली आहे.