लिलाव होऊनदेखील गाळे हस्तांतर रखडले
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. भाडेकराराची मुदत संपल्याने लिलाव आयोजित केला होता. पण काही भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेऊन लिलावास आव्हान दिले आहे. त्यामुळे लिलाव झाल्यानंतरही गाळे हस्तांतर करण्यास अडचण निर्माण झाल्याने प्रतिमाह 10 लाखाहून अधिक भाडय़ावर मनपाला पाणी सोडावे लागत आहे. न्यायालयातील याचिकेचा निकाल कधी लागणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेल्या व्यापारी संकुलांतील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र 169 गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपुष्टात आल्याने नव्याने भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. काही गाळय़ांचा लिलाव करण्यात आला होता. पण गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने लिलाव प्रकियेला स्थगिती देण्यात आली होती. महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केल्यानंतर वादग्रस्त गाळे वगळून लिलाव करण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यामुळे महापालिकेने 101 गाळय़ांचा लिलाव केला असून या माध्यमातून मनपाला वर्षाला 1 कोटी 31 लाख भाडे मिळणार आहे. लिलाव प्रक्रियेवेळी मनपाकडे 17 लाख रुपये अनामत जमा झाली आहे. पण गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयाच्या याचिकेची सुनावणी झाली नसल्याने मनपाला प्रतिमहिना दहा लाखाहून अधिक भाडय़ावर पाणी सोडावे लागत आहे.
धारवाड उच्च न्यायालय आणि स्थानिक न्यायालयात 68 गाळेधारकांनी याचिका दाखल केली आहे. पण वादग्रस्त गाळय़ांसह अन्य 101 गाळे भाडेतत्त्वावर देण्याचे रखडले आहे. लिलाव प्रक्रिया राबवूनदेखील गाळे भाडेकरूंना हस्तांतर करण्यात न्यायालयाची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल कधी लागणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. न्यायप्रविष्ट गाळे वगळता अन्य गाळे भाडेतत्त्वावर देण्यास न्यायालयाने परवानगी दिल्यास मनपाला भाडे मिळू शकते. पण न्यायालयात सुनावणी झाली नसल्याने जैसे थे परिस्थिती आहे.