शिराळा / वार्ताहर
वाकुर्डे बु | जलसिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बंद पाईप मधून येणाऱ्या पाण्याचे पूजन रेठरे धरण (ता.वाळवा) येथील तलावामध्ये मंगळवार दि.३ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, विश्वासचे संचालक विश्वास कदम, सरपंच सुखदेव पाटील, सरपंच विजय महाडिक, सरपंच महादेव पाटील, सर्जेराव यादव, सहाय्यक अभियंता आदी प्रमुख दिपक पारळे उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, वाकुर्डे बु | योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बंद पाईप लाईनची चाचणी नुकतीच नुकतीच घेण्यात आहे. दुसऱ्या टप्प्यातील बंद पाईप मधून येणाऱ्या पाण्याचे पूजन रेठरे धरण (ता.वाळवा) येथील तलावामध्ये मंगळवार दि.३ मे रोजी दुपारी ४ वाजता जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सध्या शिराळा, वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेसाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दोन अडीच वर्षांत तब्बल तीनशे कोटींचा निधी या योजनेसाठी दिल्यामुळे या योजनेला गती मिळाली आहे. तर रेठरे धरण ते मरळनाथपुर, शिवपुरीची पाईप लाईन पुर्ण झाली असून या भागात पंधरा दिवसात पाणी येईल. तसेच कार्वे धरण, ढगेवाडी पासून इटकरेच्या हद्दीत ५०० मिटर वनविभागाची जमीन असल्याने प्रस्ताव पाठविला आहे. सदर प्रस्ताव एक महिन्यात येईल त्यामुळे दिड महिन्यात सदर योजनेचे पाणी इटकरे पर्यत पोहचेल.
वाकुर्डे जलसिंचन योजना पुर्णत्वास आल्याने स्व. लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांची स्वप्नपूर्ती पुर्णत्वास येऊ लागली आहे. सन २०१४ ला शिवाजीराव नाईक आमदार असताना कालव्यातून येणारे पाणी बंदीस्त पाइप लाईन मधून आणण्याचा बदल केला आहे. या बंदीस्त पाईप लाईनमुळे मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा पाझर व गळती ही रोखली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी भुसंपादन कराव्या लागल्या असत्या त्यामुळे भुसंपादनावर होणारा मोठा खर्च वाचला आहे. सदर बंदीस्त पाईपा तीन फुटांपेक्षा खोल असल्याने शेतकऱ्यांना या पाइपलाईनचा शेतीसाठी कोणताही त्रास किंवा अडथळा होणार नाही. शिराळा उत्तर सर्व गावे पाण्याखाली येणार आहेत. तसेच या योजनेची उर्वरित कामे गतीने केली जातील.
तर माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनीचे भूसंपादन वाचले त्यामुळे ६५ कोटी रुपये वाचले तेच पैसे वाकुर्डे योजनेकरिता वापरता आले. वाकुर्डेसाठी चांदोली धरणातील ६.९८ टी.एम. सी.पाण्याची तरतूद आहे. त्यामुळे पाणी कमी पडणार नाही. सध्या वाकुर्डे योजनेमध्ये आंबेवाडी, शिरशी, निगडी, पाडळेवाडी, शिवरवाडी या गावचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती नाईक यांनी दिली.