जलशक्ती अभियानच्या दुसऱया टप्प्याचे फोंडय़ात उद्घाटन : रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी केंद्र सरकारची ‘कॅच द रेन’ टॅगलाईन
प्रतिनिधी /फोंडा
गोवामुक्तीनंतर राज्याच्या लोकसंख्येत तिपटीने वाढ झालेली असून पिण्यायोग्य पाणी जनतेपर्यंत पोचविण्यासाठी सरकारला कसरत करावी लागत आहे. भविष्यात पाणीबाणीसारखी समस्या राज्यात उद्भवू नये यासाठी आज विद्यार्थीदशेतूनच जलसाक्षर पिढी घडविणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटीचे उद्दिष्ठ ठेवताना खेडय़ाकडे दुर्लक्ष होऊ नये. कष्टकरी शेतकऱयांसह प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे पावसाचे पाणी वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा तेव्हाच केंद्र सरकारच्या ‘कॅच न रेन’ या टॅगलाईनसह खरे फलित होईल व पाण्य़ाचा साठा पुढील पिढीसाठी सुरक्षित राहील असे प्रतिपादन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
जलस्रोत खात्यातर्फे काल गुरूवारी फोंडा येथील राजीव कला मंदिर येथे सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय जल शक्ती अभियानाचा दुसऱया टप्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री रवी नाईक, जि. प. सदस्य नारायण कामत, बेतोडय़ाचे सरपंच विशांत गावकर, शिरोडा भाजपा मंडळाचे सुरज नाईक, जलस्रोत खात्याचे अभियंते सुभाष बदामी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या ‘कॅच न रेन’ ही संकल्पना जल शक्ती अभियानाअंतर्गत खेडोपाडय़ात पोचविणे गरजेची असून पावसाळी पाण्याच्या संवर्धनाची मोहीम राबविण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. जलसंवर्धनासाठी सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जलस्रोत खात्याच्या सहकार्याने पाणी अडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत पंधरा हजार खड्डे राज्यभर मारण्याचा संकल्प केला आहे. भुगर्भातील जलसाठा वाढविण्यासाठी हा प्रयत्न असून प्रत्येक शेतकऱयाने पुढाकार घ्यावा असे सांगितले. अमृत सरोवर या अंतर्गत मंदिरासमोरील व इतर तळय़ाची गाळ उपसणे, तळय़ाचे सौदर्यीकरणासह पाण्याचा प्राणवायूची क्षमता जाणून घेण्यासाठी जलस्रोत खात्याने उपक्रम हाती घेतलेला आहे.
पाणी जपून वापरा, तारांकित हॉटलात इंधनापेक्षा पाणी महाग
यावेळी बोलताना कृषी मंत्री रवी नाईक म्हणाले राज्यात सद्यपरिस्थितीत पिण्याच्या पाण्याच्या तुलनेत इंधन पेट्रोलचे दर प्रति लिटरप्रमाणे स्वस्त आहेत. मात्र तारांकित हॉटेलात पिण्याचे बाटलीबंद पाण्याचे दर त्याहून जास्त असल्याचे सांगताना यावरून पाण्याचे महत्व आज युवकांनी जाणून घ्यावे. भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी युद्धही होण्याची भिती कृषी मंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केली. सरकारमार्फत पाण्याच्या संवर्धनसाठी धरणे, बंधारे, गाळ उपसण्याचे उपक्रम हाती घेत असून आज सर्व नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
एक बादली पाणी शुद्धिकरणासाठी सरकारला सहा रूपये खर्च
यावेळी बोलताना जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी म्हणाले की केंद्र सरकारने सन 2019 सालापासून ही योजना सुरू केलेली असून कोविड महामारीमुळे त्यात खंड पडला होता. पावसाळयातील पाण्याचे संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱयांना खात्यातर्फे रू. 5 लाखाची अनुदान देण्यात येते. एनजीओच्या समुहाने पुढाकार घेत याचा लाभ घ्यावा. आज एक बादलीभर पाण्याच्या शुद्धिकरण करून ग्राहकांपर्यत पोचविण्यासाठी सुमारे 6 रूपये खर्च येत असतो. त्यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन अभियंत्याने केले.
यावेळी ग्रामपातळीवर जलसंवर्धनाविषयी जागृती करणाऱया नागरिकांचा सन्मान करण्यात आला. अशोक गोपीनाथ नाईक कोनशे-निरंकाल, क्रिस्तेव्ह डिकॉस्ता मुशेर-पंचवाडी, मधू विष्णू खांडेपारकर सातेरीमळ-निरंकाल, विनय विश्वनाथ गावस केळवाडा केरी सत्तरी, सिद्धार्थ शंभू प्रभू धुलपे शिरोडा यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पाज कोनशे पाणलोट संघ, शिव साई शेतकरी संघ बेतोडा, आंबेगण शेतकरी संघ पंचवाडी, उबजेन पाणलोट संघ वरचा बाजार फोंडा यांचा पाणी अडवा पाणी जिरवा खड्ढे मारण्यासाठी मंजूरीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक सुभाष बदामी यांनी केले. जलस्रोत खात्याचे अभियंता अंकुश गावकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शेतकऱयांसह उपस्थितांना जलसंवर्धनाची शपथ दिली. शिरोडा मतदासंघातील हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याची लक्षणीय उपस्थिती होती.