मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन. ओबीसी महासभेच्या मागण्यांकडे लक्ष देणार. ओबीसी महामेळाव्याची सांगता.
डिचोली/प्रतिनिधी
मानवता हाच श्रेष्ट धर्म मानून काम करताना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत अंत्योदय या तत्वावर सर्वांचे काम करण्याचे ध्येय बाळगून आपण काम करीत आहे. त्यात ओबीसींच्या मागण्या काही प्रमाणात मागे राहिल्याही असतीत. मागील साडेतीन वर्षे संघर्षमयी होती. आर्थिक परिस्थिती कसरतीची होती. त्यामुळे काही गोष्टी राहिल्या, पण आपले लक्ष सर्वत्र आहे. काही सरकारी सोपस्कार प्रक्रिया यामुळे काही कामे मागण्या राहिल्या असतील, मात्र हेतुपुरस्सरपणे ओबीसीच्या मागण्यावर दुर्लक्ष झालेले नाही. म्हणूनच आपल्या मंत्रीमंडळीतील तीन मंत्री हे ओबीसी आहेत. आणि या महासभेतर्फे मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांवर आपण गांभीर्याने लक्ष देत त्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालणार, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात दिले.
अखिल भारतीय ओबीसी महासभा गोवा विभागातर्फे साखळी रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या डिचोली – सत्तरी तालुका ओबीसी महामेळाव्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार धर्मा चोडणकर, समाजसेविका रॉयेला फर्ना?डिस, महासभेचे अध्यक्ष शशिकांत घाडी, कार्याध्यक्ष विठोबा घाडी, महिला अध्यक्षा सपना मापारी, अजित केरकर, अनिल वळवईकर आदींची उपस्थिती होती.
कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आपण कार्यरत
राज्यात ओबीसीला देण्यात येणारे आरक्षण हे 27 टक्के असले तरी ते पूर्णपणे मिळत नाही, त्यात काही त्रुटी असल्याने काही समाजांवर अन्याय होतो. त्यासाठी ओबीसी महासभेच्या विनंतीवरून त्यांच्या मागण्या व इतर विषय लक्षात घेण्यासाठी आपण लवकरच वेळ देणार आणि सर्व मागण्या मान्य व्हाव्या यासाठी प्रयत्न करणार. आपल्या हातून कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आपण कार्यरत आहे. ओबीसींसाठी अनेक योजना असून शिक्षण व व्यवसायासाठी कमी व्यारदरात कर्ज देत आहे. महासभेच्या कार्याला आपला आणि सरकारचा सदैव पाठिंबा असणार असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
ओबीसी महासभेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित यावे
बहुजन समाजावर गोवा मुक्तीपूर्वी खूप अन्याय झालेला आहे. स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याची फळज चाखत असताना ओबीसींवर कशा पध्दतीने अन्याय होत आहे ते आम्ही पाहत आहे. याला आमच्यात नसलेला संघटितपणा कारणीभूत आहे. या गोष्टीकडे भविष्यात गांभीर्याने न पाहिल्यास परिस्थिती गंभीर आहे. तरीही आज आमच्या राज्यासाठी लाभलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून ओबीसीला मोठय़ा अपेक्षा व विश्वासही आहे. आणि त्या पूर्ण होणार असा विश्वास आहे. त्यासाठी आपल्यातील संघटीतपणा राखण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे. आमच्या काही नेत्यांनी समाजाला एकत्रित आणलेच नसल्याने आज ओबीसी समाज विखुरलेला दिसत आहे. म्हणूनच या ओबीसी महासभेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहन माजी धर्मा चोडणकर यांनी आपल्या भाषणात केले.
जुन्या व नव्या पिढीतील “जनरेशन गावस प” कमी करण्याची गरज.
रॉयला फर्ना?डिस यांनी यावेळी, सर्व ओबीसी समाजांनी संघटीतपणे कार्य केल्यास आमच्या समस्या सोडवून घेण्यास लाभ होणार. महात्मा गांधीजींची संघटीत भारत हि संकल्पना या महासभेतून पुढे जाताना दिसत आहे. आजची नवीन पिढी व मागील पिढी यामधील “जनरेशन गेप” कमी करून त्यांना आपल्या पारंपरिक व सांस्कृतिक ठेव पुढे नेण्यासाठी उत्सुक करणार, यावर विचार होणे आवश्यक आहे.
स्वागत शशिकांत घाडी यांनी केले. ओबीसींच्या अनेक मागण्या आहेत. त्यांचे निवेदन मुख्यमंत्री तथा सरकारला दिलेले आहे. त्या सर्व मागण्या पूर्ण होणार अशी आशा असून यापुढे ओबीसींसाठी चांगले दिवस येणार अशी अपेक्षा बाळगतो, असे म्हटले. सूत्रसंचालन पंकज नमशीकर यांनी केले. यावेळी ओबीसी समाजातील विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रांगोळी व वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. तर महिला अध्यक्षा सपना मापारी यांनी आभार मानले.