शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर : वैचारीक मतभेद दूर ठेवून सीमाबांधवांच्या पाठिशी : सामजस्यांची भूमिका म्हणजे हातमिळवणी नव्हे
कोल्हापूर प्रतिनिधी
सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची भूमिका चुकीच्या पद्धतीची राहिली आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी राज्य सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली आहे. राज्यातील आम्ही सर्व राजकीय पक्ष वैचारीक मतभेद असले तरी सीमाप्रश्नाच्या मुद्दय़ावर एक आहोत. हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व पक्ष सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे राहू, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे केले. सीमाप्रश्नी सामजस्याची भूमिका घेतली असली तरी कर्नाटकशी हातमिळवणी कदापि शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱयावर आलेल्या मंत्री केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीमालढा, सीमाबांधवांविषयी असणारी राज्य सरकारची आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर त्यांनी इतर मुद्दय़ांवरही भाष्य केले.
सीमाप्रश्नांसंदर्भात राज्य सरकारने उच्चाधिकार समितीची नुकतीच पुनर्रचना केली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्यानंतर संतप्त भावना व्यक्त झाला. दोन्ही राज्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया विचारली असता मंत्री केसरकर म्हणाले, राजकीय पक्ष म्हणून राज्यातील आम्हा सर्व पक्षांत मतभेद असले तरी सीमाप्रश्नी, सीमाबांधवांबद्दल आमच्या भावना एकसारख्या आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यानंतरही हा प्रश्न सुटावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सामजस्याची भूमिका घेतली आहे. तशीच भूमिका कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाईल, अशी आम्हाला आशा आहे. चर्चेव्दारे, सामजस्यांने सीमाप्रश्न सोडविण्याचा दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, कर्नाटकनेही प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही मंत्री केसरकर यांनी केले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाईची भाषा कर्नाटक सरकारने केली आहे, या विषयी छेडले असता मंत्री केसरकर म्हणाले, राऊत ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबरोबर आमचे वैचारीक मतभेद असले तरी सीमालढय़ांत आम्ही एक आहोत. दोन्ही राज्यातील संबंध बिघडतील, अशी कारवाई कर्नाटक सरकारने करू नये, असेही त्यांनी सांगितले.
जनतेच्या भावना पेंद्र सरकारकडे कळविल्या
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राज्यात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. याविषयी छेडले असता मंत्री केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे कुणीही बोलले तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही. जनतेच्या भावना आम्ही केंद्र सरकारला कळविल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारींना योग्य ते निर्देश दिले असतील, अशी आहे.
मंत्री केसरकर…..
- भाजप आणि शिंदे गटाची विचारधारा एकच
- विचारधारेसाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला.
- आम्हाला गद्दार संबोधून लोकांची सहानुभूमी मिळविण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न.