शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांचा टोला
कोल्हापूरात शिवसंवाद सभेला भरपावसातही गर्दी
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यात सध्या दोघा जणांचे जंबो मंत्रीमंडळ कार्यरत आहे. यातील खरा मुख्यमंत्री कोण हेच येथील जनतेला कळेना, असा टोला शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. तसेच वारंवार वादग्रस्त विधाने करुन हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल हे ‘राजकीय राज्यपाल’ असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. शिवसेनेतर्फे मिरजकर तिकटी येथे शिवसंवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आदेश बांदेकर, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, माजी आमदार सुरेश साळोखे, सत्यजीत पाटील-सरुडकर, सुजित मिणचेकर, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत साळोखे, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, शहरप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान भरपावसात आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठावरुन उतरुन थेट शिवसैनिक व प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या 40 गद्दारांना आम्ही काय नाही दिले असे सांगून आम्ही कुठे चुकलो व कमी पडलो अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी उपस्थितांमधून टाळ्यांच्या व घोषणांच्या गजरात त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली. समोरील शिवसैनिकांची गर्दी पाहून इथून पुढे येईल ते नवे नेतृत्व पुढे येईल, मला इथे कोल्हापूरचे भावी खासदार व आमदार दिसत आहेत, असे ठाकरे म्हणताच त्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली.आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडलेले 40 आमदार व 12 खासदार हे गद्दारच आहेत. राक्षसी महत्वकांक्षा व सत्तेची चटक असणाऱया या गद्दारांनी सत्तेसाठी पलिकडे उडी मारली. मी स्वतःहून विकलो नाही म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. परंतु पक्ष सोडून गेलेले हे गद्दार आपल्या डोळ्याला डोळा मिळवू शकत नाहीत.
ते पुढे म्हणाले, सध्या राज्यातील राजकारणाने पातळी सोडल्याचे दिसत आहे. दोघा जणांचे जंबो मंत्रीमंडळ कार्यरत असून ते निर्णय घेत आहेत. या दोघातील खरा मुख्यमंत्री कोण हेच येथील जनतेला समजेना झाले आहे. यांच्या मंत्रीमंडळाला तिसरा माणूस मिळेना झाला आहे. कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांनीच मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा छातीवर दगड ठेवून घेतल्याचे म्हंटले आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत केलेले विधान हे घातक आहे. यामध्ये हिदुंमध्ये फूट पाडून स्वतःचे राजकारण करण्याचे काम सुरु असल्याचे दिसत आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता याला भिक घालणार नाही. यावरुन लोकशाही धोक्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता आपण लोकशाहीच्या बाजूने राहायचे की सत्तेच्या बाजूने हे जनतेनेच ठरवावे. असेच प्रेम व आशिर्वाद कोल्हापूरकरांनी आम्हाला द्यावेत. जेणेकरुन अजूनही राजकारणात चांगल्या लोकांना स्थान आहे हा संदेश जगभरात जाईल.