पुणे / प्रतिनिधी :
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून आमच्याविरोधात दिलदारपणे टीका व्हायची आणि तितक्याच दिलदारपणे ती स्वीकारली जायची. राजा किंवा कुठलाही मोठा माणूस, हा दिलदार असला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या सांगण्यासाठी प्रशासक विक्रम कुमार यांची महापालिकेत त्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, मेळाव्यासाठी मैदान मिळू न देणे, हे दुर्दैव असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे. शरद पवार मुख्यमंत्री असतानादेखील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे दिलदारपणे पवार साहेबांवर टीका करायचे आणि यालाच तर खरी गंमत म्हणतात. विरोधक तर असलाच पाहिजे आणि तोही दिलदार असला पाहिजे. बाळासाहेबांची भाषणे आम्हीदेखील उत्सुकतेने लाईव्ह पाहत असायचो. आपल्या विरोधात काय बोलतात, हे जाणून घ्यायचो. नेता नुसता पदाने मोठा होत नाही. तो मनाने मोठा असावा लागतो.
अधिक वाचा : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
…तर समजेल माझ्या कामाचा वेग
माझे आयुष्य अतिशय पारदर्शक असून, मी मागील 13 वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करीत आहे. माझे फेसबुक, ट्विटर कोणी थोडासा वेळ काढून पाहिले, तर माझ्या कामाचा वेग समजेल. देशातील अनेक जण मला फॉलो करतात, अशा शब्दात सुळे यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांना टोला लगावला.
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या येण्याचा आनंद
अर्थमंत्री निर्मला सीतारामन मतदारसंघात येणार असल्याने काय अपेक्षा आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत अनेकदा भेट होते. त्या माझ्या मतदारसंघात येत असल्याने खूप आनंद होत आहे. अरुण जेटलीदेखील बारामतीमध्ये आले होते. ते गोविंदबागेत राहिले होते. त्यावेळीदेखील अतिशय चांगला कार्यक्रम झाला होता. त्यांनी कृषी केंद्राला भेट दिली होती. बारामती मतदारसंघात अनेक संस्था चांगल्या काम करीत आहेत. त्या सर्वांना अर्थमंत्र्यांनी निश्चित भेट द्यावी आणि त्या पाहण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
दादा पालकमंत्री असताना आठवडय़ाला बैठका व्हायच्या
दादा पालकमंत्री असताना दर आठवडय़ात जिल्ह्यातील प्रश्नांबाबत आढावा बैठक होत होती. परंतु दुर्दैवाने मागील अडीच महिन्यापासून जिह्याला पालकमंत्री नसल्याने आढावा बैठक होत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नवाब भाईंना डावलणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना कार्यकारिणीमधून डावलण्यात आले आहे का, यावर त्या म्हणाल्या, नवाब मलिक यांना अजिबात डावलण्यात आलेल नाही. माझे त्यांच्या मुलींशी रोज बोलणे होते. नवाब भाईंना डावलले नाही आणि डावलले जाणार नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्या कुटुंबियांसोबत सतत मी संपर्कात असल्याचेही सुळे यांनी या वेळी सांगितले.