ब्रह्माकुमारी बेळगाव शाखेतर्फे तरुण भारत कार्यालयात कार्यक्रम
बेळगाव : आत्मस्मृतीचा टिळा लावून, ईश्वराला स्मरून, दुखाला दूर करणे म्हणजेच भक्ती होय. आध्यात्मिक ज्ञानयोग व सहजराज योग असे दोन प्रकार असून आपला व ईश्वराचा भक्तीभावाने संबंध जोडणे हेच आध्यात्मिक ज्ञान होय, असे विचार प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या साधक साधना बहेन यांनी व्यक्त केले. दरवर्षी राखी पौर्णिमेच्यानिमित्ताने ब्रह्माकुमारीच्या बेळगाव शाखेतर्फे सर्व माध्यमांच्या कार्यालयात राखी पौर्णिमा साजरी केली जाते. साधक भगिनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना राखी बांधून प्रसाद देतात. तरुण भारत कार्यालायामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी साधना बहेन यांनी हे विचार व्यक्त केले.
आपले रक्षण फक्त परमात्माच करणार
आज प्रत्येकजण चिंताग्रस्त आहे. ज्यांच्याकडे अफाट श्रीमंती आहे तो सुद्धा चिंताक्रांत आहे आणि ज्यांच्याकडे नाही तोही चिंताक्रांत आहे. म्हणजेच आपले जीवन चिंतेने ग्रासले आहे. कोणालाही बंधन नको आहे. अशावेळी आपले रक्षण फक्त तो परमात्माच करणार आहे आणि स्नेह व प्रेमाच्या धाग्यांनीच आपण जोडले जाणार आहोत, असे त्या म्हणाल्या.