पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे आश्वासन : गिरी, तार नदी पात्राची केली पाहणी,शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या,पुढील पावसाळय़ापूर्वी कायमचा तोडगा काढला जाईल
प्रतिनिधी /म्हापसा
पावसाळय़ात बार्देश तालुक्यातील पर्वरी, साळगाव, हळदोणा मतदारसंघातील शेतकरी वर्गाना पावसामुळे बराच फटका बसतो. अतिवृष्टीमुळे भाताच्या शेतात पाणी भरून नुकसान होते. ही समस्या गंभीर असून यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी सकाळी गिरी तसेच तार नदीच्या पात्राची पाहणी करून या भागातील शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावर पुढील वर्षी पावसाळा येण्यापूर्वी कायमचा तोडगा काढण्यात येईल, असे ठोस आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शेतकऱयांना दिले. हमरस्ता व जलस्त्रोत्र खात्याच्या अधिकाऱयांशी बैठक घेऊन याबाबत निविदा काढून तार नदीच्या पात्राची पूर्णतः विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही पर्यटन मंत्र्यांनी दिली.
गिरी ते तार नदीपर्यंत पावसाळय़ात सर्वत्र पाणी भरते व शेतीही पाण्याखाली जाते. हा प्रश्न दरवर्षी उद्भवतो. याबाबत काही शेतकऱयांनी तक्रारही मंत्र्यांकडे केली होती. सोमवारी पर्यटनमंत्र्यांनी पर्वरीच्या मान्सूनपूर्व तयारीची बैठक खाते प्रमुखासमवेत सरकारी विधानसभा सभागृहात घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी मंगळवारी तार नदीचे पात्र तसेच गिरी भागात येऊन पाहणी केली.
तार नदीत पावसाळय़ात पाणी अडून राहते ः पर्यटनमंत्री
तार नदी गिरवडे ब्लॉकमुळे पाणी विरुद्ध दिशेने जाते. त्यामुळे हळदोणा, गिरी, पर्वरी भागातील शेतकरी वर्गांना शेतात पाणी राहून शेतीचे नुकसान होते. ते कष्ट करतात मात्र त्यांना फळ मिळत नाही. गेली 3 वर्षे सलग आम्ही येथे येत असून यावर तोडगा काही निघत नाही. हमरस्तावाल्याचे काम जवळ जवळ संपत आले आहे. आज जलस्त्रोत्र व अभियंता कंत्राटदारांना येथे घेऊन आपण पाहणी केली असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदा पाण्यात डेबरीज झाडाची वाढ जास्त झालेली आहे. नदी डेबरीज झाडानी झाकून गेली आहे. पर्वरी, सुकूर, गिरी, पालये, हळदोणे या भागात पाणी जायला पाहिजे व वाट न मिळाल्याने पुन्हा विरुद्ध दिशेने वाहते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार असून पुढील पावसाळय़ापूर्वी ही समस्या कायमस्वरुपी मिटविण्यात येईल, असे आश्वासन मंत्री खंवटे यांनी दिली.
डेबरीज काढल्यानंतर पाणी सुरळीत जाईल
पर्वरी, सुकूर, गिरवडे येथील शेतकऱयांना बोलावून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांच्याकडे त्यांचे कागदपत्र मागितले आहे. सध्या तात्पुरते जलस्त्रोत्र खाते येथे मशिनरी घालून पाण्यात जे झाडे तयार झाली आहे ती काढून नदी साफ केली जाईल. डेबरीज काढल्यानंतर पाणी सुरळीत बाहेर जाऊ शकेल असे ते म्हणाले. दरम्यान यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सर्व माहिती जाणून घेतली आहे. नाला, गटार गाळ कुठे उसपणे गरजेचे आहेत याची सर्व माहिती घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलणी निविदाही काढण्यात येईल व पुढील वर्षापर्यंत समस्या कायमची सुटेल, असे मंत्री म्हणाले.