येळ्ळूर येथील बैठकीत शेतकऱयांचा निर्धार ः उद्याच्या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ येळ्ळूर
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शहरापासून 10 ते 12 कि. मी. अंतरावर रिंगरोड करण्याचा प्रस्ताव घातला आहे. याबाबत नोटिफिकेशन देण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व सुपीक जमिनीचाच समावेश आहे. रिंगरोडला जमीन घेतली तर अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही रिंगरोडला जमीन देणार नाही, असा निर्धार येळ्ळूरवासीयांनी केला असून सोमवारच्या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते. येळ्ळूरवासीयांनी अनेक लढे लढले आहेत. त्या लढय़ामध्ये नेहमीच यशस्वी झाले आहेत. शेतकऱयांचा हा लढाही महत्त्वाचा आहे. त्यामुळे या लढय़ामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी विविध मान्यवरांनी केले. माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. राजाभाऊ पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सिद्धगौडा मोदगी, आर. आय. पाटील, रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मरगाळे, मनोज पावशे, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. शाम पाटील, विलास घाडी, आर. एम. चौगुले, चेतन पाटील, एस. एल. चौगुले यांनी आपले विचार व्यक्त केले.
येळ्ळूर गावचा चाबूक मोर्चाला पाठिंबा
ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी गावच्यावतीने या चाबूक मोर्चाला पाठिंबा दिला आहे. प्रकाश अष्टेकर यांनी सूत्रसंचालन केले. दुद्दाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले. बैठकीला येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे उपाध्यक्ष राजू पावले, रावजी पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, शिवाजी सायनेकर, गोपाल शहापूरकर, नारायण बस्तवाडकर, परशराम घाडी, शंकर मालुचे, वाय. सी. इंगळे, नागेंद्र पाखरे, भरत मासेकर, प्रदीप देसाई, ग्राम पंचायत सदस्या मनीषा घाडी, शालन पाटील, वनिता परीट, शिवाजी कदम, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.