पुणे / प्रतिनिधी :
मुंबई, पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेवरही भाजपा व शिंदे गटाचेच वर्चस्व राहणार असून, सगळय़ा नगरपालिकांसोबतच जिल्हापरिषदेच्या निवडणुकादेखील आम्हीच जिंकणार असल्याचा दावा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बुधवारी येथे केला. बाळासाहेबांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुढे नेत असून, त्यांची दसऱ्याची परंपरा कायम ठेवण्यासाठीही ते कटिबद्ध असल्याचे विधान त्यांनी केले.
पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. केसरकर म्हणाले, भाजप आणि शिवसेना एकत्र असून, मुंबई महापालिकेत आमचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. त्यामुळे निवडणुकीत आमचेच वर्चस्व राहणार. पुणे व पिंपरी महापालिकेतही आमचाच झेंडा फडकेल. तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आम्हीच बाजी मारणार, यात कोणतीही शंका नाही. यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत काय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरवतील. मुख्यमंत्री हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ असून, त्यांच्या विचारांसाठीच ते लढत आहे. याशिवाय बाळासाहेबांची दसऱयाची परंपरा कायम ठेवण्यासाठीही ते कटिबद्ध आहेत. परंतु याबाबत काय करायचे, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. यामध्ये मुख्यमंत्री कोणतेही राजकारण येऊ देणार नाहीत.
अधिक वाचा : चिनी धोरणांच्या विश्लेषणकर्त्या तज्ज्ञांची भारतात कमतरता, माजी परराष्ट्र सचिव श्याम सरण यांची खंत
शिवसेनेला दसरा मेळावा घ्यायचा असेल, तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घ्यावे. मंचावर बोलवावे. म्हणजे लोकांना कळेल, की कोण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले आहे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला. जनतेच्या समोर हिंदुत्व म्हणून जायचे आणि नंतर सत्तेसाठी निष्ठा बदलायची. हे महाराष्ट्राच्या जनतेला सहन होण्यासारखे नाही. आम्ही जनतेसाठी काम करत आहोत. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य असून, आम्हाला राज्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. आम्हाला राजकारण न करता जनतेसाठी काम करायचे आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.