यंदाही महिला स्वयंसाहाय्य गटांकडून अटल ग्राम योजनेच्या माध्यमातून लागवड, 2019 पासून सातत्याने घेतले जाते पीक, गावातच होते विक्री
प्रसाद तिळवे / सांगे
सांगे तालुक्यातील वेर्ले हे थंड हवेचे ठिकाण असून चोहोबाजूंनी नेत्रावळी अभयारण्याने गावाला वेढा घातला आहे. सह्याद्रीच्या डोंगरकपारीत असलेला हा गाव 2013 पासून स्ट्रॉबेरीमुळे प्रकाशात आला. आता तो स्ट्रॉबेरीचा गाव म्हणून ओळखला जातो. यंदाही गावातील महिला स्वयंसाहाय्य गटांनी अटल ग्राम योजनेच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी उत्पादन घेण्यास प्रारंभ केला आहे.
सांगे येथील डोंगरमाथ्यावर वसलेल्या वेर्ले गावात 2019 पासून दरवर्षी स्ट्रॉंबेरी लागवड केली जात आहे. स्थानिक महिला गट या कामात सक्रिय आहेत. पर्यटकांचीही मोठी गर्दी येथे पाहायला मिळते. अटल ग्राम योजनेच्या अंतर्गत हा उपक्रम सुरू आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाला वेर्लेत पोषक वातावरण असून उत्पादन चांगले होते. सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय’ मोहिमेच्या दृष्टीने उचललेले हे एक यशस्वी पाऊल आहे. गोमंतकीय तसेच देशी आणि विदेशी पर्यटकांवर भुरळ पडणारी वेर्लेची प्रसिद्ध स्ट्रॉंबेरी पुन्हा एकदा त्यासाठी सज्ज झाली आहे. एरव्ही नेत्रावळीतील सावरी धबधबा आणि तुडवचा मैनापी धबधबा पर्यटकांना साद घालत असतो.
2013 मध्ये पहिल्यांदा लागवडीचा प्रयोग
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2013 साली राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून नेत्रावळी हा ‘आदर्श गाव’ म्हणून विकसित करण्यास प्रारंभ केला. पर्रीकर यांचे नेत्रावळी गावावर भरपूर प्रेम. प्रशासकीय अडचणींमुळे अटल ग्राम योजना पुढे जाण्यात अडथळा निर्माण होऊ लागला. त्यानंतर 2018 साली अटल ग्राम यंत्रणेचा जन्म झाला. 2013 साली वेर्ले गावच्या महिलांनी मिनरल फाऊंडेशनच्या मदतीने पहिल्यांदाच स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी करून दाखविलेला प्रयोग 2019 साली अटल ग्राम यंत्रणेने पुढे नेला.
स्वयंसाहाय्य गटांच्या महिलांचे कष्ट
सरकारच्या सर्व सुविधा पुरवून शून्य गुंतवणुकीने वेर्लेच्या महिला स्वयंसाहाय्य गटांनी उत्पन्न घेण्यास सुरुवात केली होती. केवळ मेहनत करून गटांच्या महिलांनी यात प्रगती केली आहे. यापूर्वी सुमारे साडेबारा लाख रुपयांची कमाई केली होती, अशी माहिती मिळाली आहे. यापुढे या महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्ट्रॉबेरी लागवड पुढे नेण्याची गरज व्यक्त होत आहे.
वर्षारंभापासून मिळते उत्पन्न
योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत रोपटय़ांची लागवड केल्यानंतर डिसेंबर अखेरीस वा जानेवारीपासून स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. एप्रिलच्या अखेरपर्यंत स्ट्रॉबेरीचा हंगाम संपतो. मागे कोरोनामुळे थोडा फटका बसला होता. आम्ही गेली पाच वर्षे स्ट्रॉबेरीचे पीक घेत आहोत. पीक घेताना उमेद येते. उत्पन्न चांगले येते. आम्हाला फायदा झाला आहे. मुख्य म्हणजे आम्हाला बाजारपेठ शोधावी लागत नाही. येथे भेटी देणाऱया पर्यटकांना उत्पादित स्ट्रॉबेरीची दररोज विक्री होते. शिवाय प्रवेश फीपोटी रक्कमही मिळते’, असे भूमिका सेल्फ हेल्प ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. लाल रंगाची, ताजी, रुचकर अशी स्ट्रॉबेरी प्रत्यक्ष जाग्यावर खाण्याचा आनंदच वेगळा आहे.
यावेळी 5 हजार चौ. मी. जमिनीत लागवड
येथे उत्पादित स्ट्रॉबेरीचे पाकीट 60 रुपयांना विकले जाते. जानेवारीच्या मध्यास मोठय़ा प्रमाणात उत्पादन येणार आहे. स्ट्रॉबेरी फार्मला भेट देणाऱया पर्यटकाकडून रु. 20 प्रवेश फी आकारली जाते. यंदा सुमारे पाच हजार चौ. मी. जागेत लागवड केली असून एकूण चार गट सहभागी झाले आहेत, अशी माहिती मिळाली. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असून त्यावर परिवाराचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होतो. यापुढे अधिक जमीन स्ट्रॉबेरी लागवडीखाली आणणार असल्याचे गटांच्या महिलांनी सांगितले.
स्ट्रॉबेरी लागवड पर्यटकांचे आकर्षण
वेर्ले, तुडव आणि साळजिणी ही गावे सांगे तालुक्याच्या नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील डोंगरमाथ्यावर आहेत. शेती आणि दुग्ध व्यवसाय ही येथील लोकांची उत्पन्नाची मुख्य साधने आहेत. ही तिन्ही गावे 20 ते 22 किलोमीटर अंतरात आहेत. पूर्वी या भागात खाण व्यवसाय सुरू होता. हा परिसर अभयारण्य म्हणून जाहीर झाल्यानंतर या खाणीही बंद झाल्या. सध्या येथे उत्पादित स्ट्रॉंबेरी गावातच खपते. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे पर्यटकही वाढू लागले आहेत.
यंदा प्रथमच बटाटय़ाची लागवड यंदा वेर्ले येथील महिलांनी बटाटय़ाची लागवड केली आहे. याशिवाय कॉलीफ्लॉवर, चिटकीमिटकी, नवलकोल, लाल भाजी यांची लागवड केली आहे. बटाटय़ाची लागवड प्रथमच केली आहे. आम्ही गुळी आणि गांडूळ खताचा वापर करतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.