कोईम्बतूर /वृत्तसंस्था
माजी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर यांच्यासारखे स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर दक्षिण विभागाने दुलीप चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पश्चिम विभागाला पहिल्या दिवसअखेर 90 षटकात 8 बाद 250 धावांवर रोखले. गुजरातचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज हेत पटेलने 96 धावांची नाबाद खेळी साकारली. तसेच, सौराष्ट्रचा अनुभवी खेळाडू जयदेव उनादकटसह (नाबाद 39) नवव्या गडय़ासाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. याच भागीदारीमुळे पश्चिम विभागाने 8 बाद 167 वरुन 8 बाद 250 धावांपर्यंत मजल मारली. रहाणे (8), अय्यर (37), सर्फराज खान (34), यशस्वी जैस्वाल (1) प्रियांक पांचाळ (7) मात्र स्वस्तात बाद झाले. दक्षिण विभागातर्फे बसिल थम्पीने 15 षटकात 42 धावात 2 बळी तर सीव्ही स्टीफनने 10 षटकात 39 धावात 2 बळी घेतले.