दक्षिण विभाग 294 धावांनी पराभूत, यशस्वी जैस्वालला दुहेरी किताब
वृत्तसंस्था/ कोईमतूर
रविवारी येथे झालेल्या खेळाच्या शेवटच्या दिवशी पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा 294 धावांनी दणदणीत पराभव करत 2022 च्या दुलीप करंडकावर आपले नाव कोरले. पश्चिम विभागाचा यशस्वी जैस्वालला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ असा दुहेरी पुरस्कार देण्यात आला. पश्चिम विभाग संघातील जैस्वालकडून मैदानावर बेशिस्त वर्तन घडल्याने या संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याला मैदान सोडण्याचा आदेश दिला.
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील या अंतिम सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा जमविल्यानंतर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 327 धावा जमवित 57 धावांची आघाडी मिळविली. पश्चिम विभागाने आपला दुसरा डाव 4 बाद 585 धावावर घोषित करून दक्षिण विभागाला निर्णायक विजयासाठी 529 धावांचे कठीण आव्हान दिले. पश्चिम विभागाच्या दुसऱया डावात यशस्वी जैस्वालने द्विशतक (265), सर्फराज खानने नाबाद शतक (127), श्रेयस अय्यरने 71 धावा आणि हेत पटेलने नाबाद 51 धावा जमविल्या.
दक्षिण विभागाने 6 बाद 154 या धावसंख्येवरून रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित चार गडी 80 धावांची भर घालत तंबूत परतले. दक्षिण विभागाच्या दुसऱया डावात सलामीच्या कुनुमलने 14 चौकार आणि 1 षटकारासह 93, रवि तेजाने 1 षटकार आणि 3 चौकारासह 53 धावा जमविल्या. पश्चिम विभागातर्फे मुलानी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 51 धावात 4, उनादकट आणि सेठ यांनी प्रत्येकी दोन तसेच चिंतन गजा आणि कोटीयान यानीं प्रत्येकी एक गडी बाद केला. रवि तेजा आणि साईकिशोर या जोडीने सातव्या गडय़ासाठी 157 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. साईकिशोरने केवळ 7 धावा जमविल्या. के. गौतमने 3 चौकारासह 17 धावा केल्या. उपाराहापूर्वीच दक्षिण विभागाचा दुसरा डाव संपुष्टात आला. भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये कसोटी संघाची निवड करताना रणजी, इराणी तसेच दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील क्रिकेटपटूंच्या कामगिरीची निवड समितीकडून दखल घेतली जाते.
जैस्वालवर कारवाई
दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यातील रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी द्विशतकवीर जैस्वालच्या मैदानावरील बेशिस्त वर्तनाने या सामन्याला गालबोट लागले. दक्षिण विभागाचा दुसरा डाव चालू असताना त्यांचा फलंदाज रवि तेजाचे लक्ष विचलित करण्यासाठी यशस्वी जैस्वालने स्लेजिंग केले. पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या समोर ही घटना झाल्याने रहाणेने यशस्वी जैस्वालला तातडीने मैदान सोडण्याचा आदेश दिला. त्याच्याकडून शिस्तभंग झाल्याने आपण ही कारवाई करत असल्याचे कर्णधार रहाणेने या सामन्यानंतर सांगितले. दक्षिण विभागाच्या दुसऱया डावातील 57 वे षटक सुरू असताना रवि तेजा याने मैदानावरील पंचाकडे जैस्वाल संदर्भात तक्रार केली. पंचांनी कर्णधार रहाणेला या संदर्भात माहिती दिली. जैस्वालला मैदान सोडावे लागल्याने या सामन्यातील काही वेळ पश्चिम विभागाला 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले होते.
संक्षिप्त धावफलक ः पश्चिम विभाग प. डाव 270, दक्षिण विभाग प. डाव 327, पश्चिम विभाग दु. डाव 128 षटकात 4 बाद 585 डाव घोषित (जैस्वाल 265, सर्फराज खान नाबाद 127, श्रेयस अय्यर 71, हेत पटेल नाबाद 51, पांचाळ 40), दक्षिण विभाग दु. डाव 71.2 षटकात सर्व बाद 234 (कुनुमल 93, रवि तेजा 53, के. गौतम 17, अगरवाल 14, पांडे 14, मुलानी 4-51, उनादकट 2-28, सेठ 2-29, चिंतन गजा 1-47, कोटीयान 1-61).