वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर पश्चिम विभाग संघाची स्थिती भक्कम झाली असून आता हा संघ जेतेपदाकडे वाटचाल करीत आहे. पश्चिम विभागाने दक्षिण विभागाला निर्णायक विजयासाठी 528 धावांचे कठीण आव्हान दिले असून दक्षिण विभागाने दिवसअखेर दुसऱया डावात 6 बाद 154 धावा जमविल्या. रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी दक्षिण विभागाला विजयासाठी आणखी 375 धावांची जरुरी असून त्यांचे केवळ 4 गडी खेळावयाचे आहेत.
या सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा जमविल्यानंतर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 327 धावा जमवित 57 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर पश्चिम विभागाने आपला दुसरा डाव 4 बाद 585 धावांवर घोषित केला. पश्चिम विभागाने 3 बाद 376 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. सलामीच्या यशस्वी जैस्वालने 323 चेंडूत 4 षटकार आणि 30 चौकारासह 265 धावा झळकविल्या. सर्फराज खानने 178 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारासह नाबाद 127 धावा जमविल्या. जैस्वाल आणि सर्फराज खान यांनी चौथ्या गडय़ासाठी 154 धावांची भागीदारी केली. जैस्वाल बाद झाल्यानंतर सर्फराज खान आणि हेट पटेल यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 103 धावांची भर घातली. पटेलने 61 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 51 धावा झळकविल्या. 128 षटकात पश्चिम विभागाने 4 बाद 585 धावांवर डावाची घोषणा केली. दक्षिण विभागातर्फे साईकिशोर आणि के. गौतम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दक्षिण विभागाच्या दुसऱया डावाला डळमळीत सुरुवात झाली. जयदेव उनादकट, सेट आणि मुलानी यांच्या अचूक गोलंदाजीसमोर दक्षिण विभागाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. दिवसअखेर दक्षिण विभागाने दुसऱया डावात 6 बाद 154 धावापर्यंत मजल मारली. सलामीच्या कुनुमलने 100 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारासह 93, अगरवालने 2 चौकारासह 14, मनीष पांडेने 3 चौकारासह 14 आणि रिकी भुईने 2 चौकारासह 13 धावा जमविल्या. उनादकट, सेट आणि मुलानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः पश्चिम विभाग प. डाव सर्वबाद 270, दक्षिण विभाग प. डाव सर्व बाद 327, पश्चिम विभाग दु. डाव 128 षटकात 4 बाद 585 डाव घोषित (जैस्वाल 265, सर्फराज खान नाबाद 127, पांचाळ 40, रहाणे 15, श्रेयस अय्यर 71, हेट पटेल नाबाद 51, साईकिशोर आणि के. गौतम प्रत्येकी दोन बळी), दक्षिण विभाग दु. डाव 40 षटकात 6 बाद 154 (कुनुमल 93, अगरवाल 14, पांडे 14, भुई 13, उनादकट, सेट, मुलानी प्रत्येकी दोन बळी).