कोल्हापूर/आशिष आडिवरेकर
आझादी का अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत जिह्यात हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिह्यातील लाखो घरांवर झेंडा उभा करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. मात्र देशातील दुसऱया क्रमांकाचा सर्वांत ३०३ फुट उंच कोल्हापूरातील झेंडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त तरी फडकणार काय? असा सवाल नागरीकांतून उपस्थित केला जात आहे. गेल्या ५ वर्षापासून या ठिकाणी उभा असलेला खांब तिरंग्याच्या प्रतिक्षेतच आहे.
कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत दुरवस्था झालेल्या पोलीस उद्यानाचा कायापालट करण्याचे नियोजन २०१७ मध्ये करण्यात आले. वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱया क्रमांकाचा सर्वांत उंच अशा ३०३ फुट उंच झेंडा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठा गाजावाजा करुन १ मे २०१७ रोजी सिनेअभिनेता अक्षय कुमार याच्या उपस्थितीत या ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले.
जाज्वल्य देशप्रेमाचा इतिहास सांगणारे उद्यान
या ध्वजस्तंभावर ९० फुट लांब व ६० फुट रुंद अशा ५ हजार ४०० चौरस फुटाचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. कोल्हापूर शहराच्या सर्व बाजूंनी हा राष्ट्रध्वज सहज दिसू शकेल, इतका उंच असून उद्यानात १८५७ ते १९४७ या काळातील भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाची मांडणी, महालढय़ाचं महाकाव्य, बलिदान, शांतता आणि समृद्धी याचं प्रतिक असणाऱया केशरी, पांढऱया आणि हिरव्या रंगातून भित्तीचित्र, छत्रपती शिवाजी महाराजांपासून देशासाठी बलिदान दिलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमा केशरी रंगामध्ये, तर पांढऱया रंगामध्ये महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांच्या शांतीचा संदेश देणाऱया प्रतिमा आहेत. हिरव्या रंगामध्ये समृद्धीने नटलेला भारत रेखाटला आहे. आगामी पिढीला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास समजावा, कोल्हापूरातील पर्यटन वाढावे या उद्देशाने या गार्डन व झेंडय़ाची उभारणी करण्यात आली होती. या सोबतच या परिसरात ट्रफिक गार्डन ही संकल्पनाही साकरली आहे.
९० बाय ६० फुटांचा राष्ट्रध्वज
या झेंडय़ावर बसविण्यात येणारा तिरंगा ९० बाय ६० फुटांचा असून त्याचे कापड डॅनियल पॉलिस्टर कंपनीचे आहे. खादीनंतर सरकारने मान्यता दिलेले हे कापड आहे. त्याचे वजन ६० ते ६५ किलो आहे. असे पाच ध्वज मागविण्यात आले होते. शहराच्या कोणत्याही भागातून या स्तंभावर फडकणारा तिरंगा लक्ष वेधून घेणार आहे. तो चौवीस तास विद्युत रोषणाईच्या झोतात फडकणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जनरेटरची सोय केली आहे. ध्वजसंहिता नियमानुसार त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र वाऱ्यामुळे या ध्वजाला नुकसान पोहोचू शकते अशी शक्यता असल्याने हे ध्वज उतरविण्यात आले.
गेल्या ५ वर्षापासून झेंडा नाहीच
या झेंडय़ावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच हा तिरंगा उतरविण्यात आला. वाऱ्याच्या वेग अधीक असल्यामुळे तिरंग्याचे नुकसान होवू शकते, असे कारण त्यावेळी देण्यात आले. यानंतर काही ठरविक वेळेलाच हा झेंडा फडविण्यात येत होता. मात्र यानंतर हा झेंडा फडकतच नाही. ५ वर्षापासून केवळ खांबच उभा आहे. झेंडय़ाच्या पोस्टवरील रोलर खराब झाला असल्याने झेंडा नसल्याचे सांगण्यात येत आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तर ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान ’स्वराज्य महोत्सव’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत लाखो घरांवर झेंडे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र कोल्हापूरची शान असणारा हा झेंडा फडकणार काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.