चिपळूण शिवसेनेच्या बैठकीत माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा सवाल
प्रतिनिधी/ चिपळूण
आज गद्दार, निष्ठावंत यांची परिभाषा वेगवेगळी आहे. आमदार भास्कर जाधवांना चिपळुणात पराभूत करण्यासाठी शिवसेनेची मते प्रभाकर शिंदे यांना न देता ती राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे वळवण्यात आली, तर मग तसे आदेश देणारे निष्ठावंत कसे? गद्दारीची व्याख्या आणि शिवसेनेत मंत्रीपदे देताना लावले जाणारे निकष नेमके काय, असा सवाल माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शुक्रवारी येथील शिवसेना बैठकीत उपस्थित केला.
शहरातील अतिथी सभागृहात तालुका शिवसेनेच्या बैठकीत स्थानिक नेतेमंडळींसह पदाधिकाऱयांनी सध्याच्या संकटात चिपळूण तालुका शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे दाखवण्यासाठी येणाऱया निवडणुकांत भगवा फडकवण्याचा निर्धार केला तर दुसरीकडे उपस्थित नेत्यांनी शिवसेनेतील सध्यग्नस्थितीवर काहीसा नाराजीचा सूर लगावला.
माजी आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, आम्हालाही मंत्रीपदासाठी शब्द दिला गेला होता. कदाचित आमची योग्यता नसेल, पण आमदार जाधव यांची कुवत होती. त्यांना शब्द देऊन मंत्री केले नाही. सध्यस्थितीत किमान शिवसेना नेते तरी करायला हवे होते, पण कुवत असून त्यांना मिळाले नाही. पदे अथवा मंत्रीपदे देताना नेते काय निर्णय घेतात, त्याचे निकष नेमके काय असतात, हेच आम्हाला आजपर्यंत कळलेले नाही. ज्यावेळी कार्यकर्ता अडचणीत असतो, त्यावेळी त्याला पक्षाने सहकार्य करायला हवे. आता निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत. ज्याच्या त्याच्या नशिबाने सर्व घडत नाही. भास्कर जाधवांना नेतृत्व करण्याची संधी मिळो, यासाठी आपल्या शुभेच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेना सध्या संकटात असून त्याची व्याप्ती वाढणार आहे. येणारे संकट परतवून लावण्यासाठी आपण खंबीर आहोत. निश्चित कार्यक्रम घेऊन चर्चा केली तर त्याचे पडसाद खालच्या कार्यकर्त्यापर्यंत उमटतात. यामुळे कार्यकर्ता सजग होतो. तुमचा पाठिंबा असेल तर चिपळूणमध्ये शिवसेनेला जिंकून देईन, असे सांगतानाच त्यांनी 1990च्या दशकातील शिवसेनेची संघर्षमय वाटचाल आणि त्यातून उभारीचा इतिहास समोर ठेवला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके यांनी खासदारांवर नाराजी व्यक्त केली. खासदार आले की, त्यांचे स्वागत करण्यासाठी काही ठराविक मंडळी पुढे जातात. त्यांच्या अवतीभवती वावरणारी मंडळी म्हणजेच त्यांच्यादृष्टीने शिवसेना आहे. साडेसात वर्षात त्यांनी एकही काम केलेले नाही. पूर्वी जाधवांची माणसे म्हणून शिक्का अन् आता चव्हाणांची माणसे म्हणून शिक्का असल्याने आम्ही कायम दुर्लक्षित रहात असल्याची खदखद व्यक्त केली.
यावेळी आमदार जाधव यांनी शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा अर्ज भरून शुभारंभ केला. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख संदीप सावंत, प्रताप शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी सभापती बळीराम शिंदे, सहसंपर्कप्रमुख अशोक नलावडे, संघटक राजू देवळेकर, महिला शहर संघटक वैशाली शिंदे, महिला तालुका संघटक सुप्रिया सुर्वे, शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.