ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये सैन्य भरती करण्यासाठी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ ही नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 4 वर्षांसाठी तरुणांना लष्करात भरती करुन घेतले जाणार आहे. पुढील 90 दिवसात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती सुरू होईल.
काय आहे ही योजना?
देशातील बेरोजगारी कमी करणे तसेच संरक्षण बजेटवरील वेतन आणि पेन्शनचा बोजा कमी करणे या उद्देशाने केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी जवळपास 40-45 हजार तरुणांना लष्करात दाखल करून घेतले जाणार आहे. हे तरुण 17 ते 21 वयोगटातील असतील. गुणवत्ता आणि वैद्यकीय चाचण्यांच्या आधारे ही भरती केली जाणार असून, या सैनिकांना सहा महिन्यांचे मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारावर मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर भरती केलेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठी त्यांना आणखी सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. उर्वरित उमेदवारांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळेल. सर्व जवानांना अग्निवीर म्हटलं जाईल.
काय असेल वेतन?
या योजनेअंतर्गत भरती झालेल्या जवानांना 30-40 हजार मासिक वेतनासह अन्य लाभही दिले जाणार आहेत. पहिल्या वर्षी 30 हजार, दुसऱ्या वर्षी 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36 हजार आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. या अग्निवीरांना 40 लाखांचे विमा कवचही असणार आहे.
या योजनेला का होतोय विरोध?
राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशासाठी या योजनेचा फायदा होईल. तसेच शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य विकास, मानसिक विकास, टीम बिल्डिंग आणि डिसिप्लीन अशा विविध गोष्टी अग्निवीरांना या चार वर्षात आत्मसात करता येतील, असे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, चार वर्षांची लष्करी सेवा संपल्यानंतर या तरुणांचे काय होणार, 22 ते 25 वयोगटातील हे तरुण कोणत्याही अतिरिक्त पदवीशिवाय आपले भविष्य कसे घडवणार? नियमित सैनिक 15 वर्षांच्या सेवेनंतर परत येतात, तेव्हा बहुतेकांना बँकेच्या गार्ड किंवा सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळते, पण या कंत्राटी भरतीमुळे तरुणांचे भवितव्य काय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.
संरक्षण तज्ञ आणि लष्करात महत्त्वाची पदे भूषविलेल्या काही लोकांनीही या योजनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अग्निपथ योजनेतून जवानांची भरती करण्याच्या या पद्धतीला काहींनी ‘टूर ऑफ ड्यूटी’ असंही संबोधलं आहे. चार वर्षानंतर भरती झालेल्या 75 टक्के तरुणांना दुसरी नोकरी देण्याची सरकारकडे कोणतीही योजना नाही. त्यांचे भविष्य अंधारात आहे. त्यामुळे तरुणांकडूनही या योजनेला विरोध होत आहे. आज सकाळीच या योजनेविरोधात बिहारमधील तरुण रस्त्यावर उतरले होते. मुझफ्फरमध्ये चक्काजाम करण्यात आला होता. तर बक्सरमध्ये तरुणांनी ट्रेनवरही दगडफेक केली.