अध्याय पंधरावा
भगवंतांच्या मूर्तीचे ध्यान लागून भक्त त्या मूर्तीशी एकरूप झाला की, तो ईश्वराच्या अस्तित्वात हळूहळू विरघळू लागतो. त्याचे ते आत्मस्वरूपात संपूर्ण विरघळणे घडून येण्यापूर्वी त्याला ईश्वरी अस्तित्वाचा अनुभव येऊ लागतो. सहाजिकच ईश्वराकडे सहज भावाने असलेल्या अणिमा, महिमा आणि लघिमा, प्राप्ती, प्राकाश्य, ईशिता, वशिता तसेच इच्छिलेल्या सुखाची प्राप्ती होणे या आठ सिद्धी साधकाला प्राप्त होतात.
सत्वगुणाच्या विशेष विकासाने भक्तामध्ये इतर दहा सिद्धी निर्माण होतात. त्या अशा, देहावर तहानभुकेचा परिणाम न होणे, पुष्कळ लांबची वस्तू दिसणे, पुष्कळ लांबचे ऐकू येणे, मनाच्या वेगाने शरीरानेही त्या ठिकाणी जाणे, पाहिजे ते रूप घेणे, दुसऱया शरीरात प्रवेश करणे, आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे, अप्सरांबरोबर होणाऱया क्रीडेचे दर्शन होणे, जो संकल्प कराल तो सिद्ध होणे, सगळय़ा ठिकाणी, सगळय़ांकडून त्याच्या आज्ञेचे पालन होणे या सर्व गुणहेतुसिद्धी होत. इथवर माहिती देऊन भगवंत उद्धवाला पुढे म्हणाले, गुणहेतुसिद्धींची माहिती मी तुला यथासांग सांगितली. आता ह्याच्याहीपेक्षाही क्षुद्र सिद्धी आहेत त्याही लक्ष देऊन ऐक. तिन्ही काळातील गोष्टी समजणे, शीतउष्ण इत्यादी द्वंद्वांचा त्रास न होणे, दुसऱयाच्या मनातील विचार ओळखणे, अग्नी, सूर्य, जल, विष इत्यादींच्या शक्ती बोथट करणे आणि कोणाकडूनही पराजित न होणे या पाच सिद्धीसुद्धा योग्यांना प्राप्त होतात.
भूत, भविष्य आणि वर्तमान ह्या तिन्ही काळांचे जे ज्ञान होते, ती पहिली सिद्धी असे समज. सुख-दुःख, शीत-उष्ण, मृदु आणि अत्यंत कठीण या द्वंद्वांना मुळीच वश न होणे हे दुसऱया सिद्धीचे लक्षण होय. दुसऱयाचे स्वप्न आपण सांगणे, दुसऱयाच्या मनातील हेतु जाणणे, हिला तिसरी सिद्धी असे म्हणतात. अग्नी, वायु, उदक, शस्त्र, विष आणि अर्क ह्यांचा शरीरावर परिणाम होऊ न देणे ही चौथी सिद्धी होय. कोणालाच कधी हार जावयाचे नाही, कोठेही गेले तरी एकटय़ानेच विजय मिळवावयाचा, ही पाचवी विजयसिद्धी होय. योगधारणा केल्याने ज्या सिद्धी प्राप्त होतात, त्यांचे मी नावासह वर्णन केले. आता कोणत्या धारणेने कोणती सिद्धी, कशी प्राप्त होते, ते सांगतो. अष्टमहासिद्धींची धारणा, दहा सिद्धींचे गुणहेतु आणि पांच क्षुद्र सिद्धींची लक्षणे ही साध्य करता येतील अशा प्रकारच्या साधनाचे वर्णन भगवंत करत आहेत. ते म्हणाले, प्रिय उद्धवा! तन्मात्र नावाचे पंचमहाभूतांचे जे सूक्ष्म रूप, ते माझेच रूप आहे जो योगी माझ्या या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो, त्याला ‘अणिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते. या अष्टमहासिद्धी स्वाभाविकपणे माझ्यामध्येच असतात, तरी त्या साध्य करायला दुर्घट आहेत. पण त्या साध्य करू पाहणारा साधक मन सूक्ष्म मन करून जर माझ्यामध्ये स्थिर ठेवून अणुरेणुमात्र अशा माझ्या स्वरूपाचेच नेहमी ध्यान करेल तर त्याचा देहही अणुप्रमाणेच होतो आणि त्याला ‘अणिमा’ सिद्धी प्राप्त होते. ज्या पदार्थाला छिद नसेल, त्या पदार्थातूनही तो निघून जातो. जगाच्या डोळय़ात भरून राहतो पण कोठेच कुणाला खुपत नाही असे झाले म्हणजे अणिमा सिद्धी प्राप्त झाली म्हणून समजावे. आपल्या मनात जो माझे महत्तत्त्वरूप धारण करतो, त्याला महत्तत्त्वाकार ‘महिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते.
त्याचप्रमाणे एकेका महाभूताची त्याने मनात धारणा केली, तरीसुद्धा त्याला त्या त्या महाभूताएवढी ‘महिमा’ नावाची सिद्धी प्राप्त होते. मी अणुरेणूंच्याही अणुरेणूइतका सूक्ष्म आहे. मी प्रत्येक जीवाच्या हृदयात राहतो. जो कोणी त्याप्रमाणेच अणुमात्र सूक्ष्म मन करून, माझ्यामध्ये स्थिर ठेवेल आणि त्या अणुरेणुमात्र माझ्याच स्वरूपाचे नेहमी ध्यान करेल, त्याचा देहही अणुप्रमाणेच होतो आणि त्याला ‘अणिमा’ सिद्धी प्राप्त होते. माझे स्वरूप अनंत आणि अपार आहे. महत्तत्त्वाहूनही अत्यंत मोठे आहे. आणि वस्तुतः पाहिले तर महत्तत्त्वाचाही खरा नियंता जो ईश्वर तो मीच आहे. हा माझा महिमा जो जाणतो त्याला महिमा सिद्धी प्राप्त
होते.
क्रमशः