ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागील काही दिवसांपासून चिघळला असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यावरुन नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री जोशी (Aniket Shastri Joshi) यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. मागील 50 वर्षात सीमाप्रश्न सोडवला नाही. आता अल्टिमेटम देऊन काय उपयोग?, त्यापेक्षा दत्त उपासना करा, असा टोला अनिकेत शास्त्रींनी लगावला.
मंगळवारी महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात हल्ला झाल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक सरकारवर आगपाखड केली. 24 तासात महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबवा, अन्यथा पुढील 48 तासात मला सर्व खासदारांसह बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, अशा शब्दात पवारांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला होता. त्यावरुन अनिकेत शास्त्री जोशी यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे.
अधिक वाचा : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूला ‘रौप्य’
अनिकेत शास्त्री म्हणाले, शरद पवार यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रातही अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. त्या 40-50 वर्षाच्या कालखंडात त्यांनी सीमाप्रश्न सोडवला नाही. आता कर्नाटक सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम देऊन काय उपयोग? हे कोणत्या तत्त्वात बसते. त्यापेक्षा आज दत्तजयंती आहे. त्यांनी दत्तउपासना करावी. दत्तजयंती निमित्त अनेक भाविक गाणगापूरला जात आहेत. तिथे जर काही कमी-जास्त झाले तर ही जबाबदारी शरद पवारांची असेल. ते वाद चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत.