‘नावात काय आहे?’ हे एका प्रसिद्ध नाटकातील वाक्म आहे. तथापि, नावात बरेच काही असते. काही नावे तर इतकी विचित्र असतात, की आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. मध्यप्रदेशात सध्या त्रिस्तरीय स्थानिक निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे अनेक गावांची आणि लोकवस्त्यांची नावे समोर येत आहेत. ती पाहिल्यावर जणू काही सगळा भारत देश, माणसांमधली नाती व इतर अनेक बाबी या गावांच्या नावात सामावल्या आहेत, असे वाटते.
हिमाचल प्रदेशमधील मसुरी, महाराष्ट्रातील खंडाळा या नावाची गावे मध्यप्रदेशात आहेत. त्याचप्रमाणे ‘चोली’ आणि ‘लंगोटी’ अशा वस्त्रांच्या नावाची गावेही आहेत. राज्यातील 52 जिल्हय़ांमध्ये 55 हजार खेडी आहेत. त्यामुळे या गावांची अनेक विस्मयकारक नावे असल्याचे दिसून येत आहे. ‘गलती’, ‘माफी’, ‘हथनी’, ‘भैंसा’ अशा तऱहेची नावेही आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर हे जिल्हय़ाचे नाव आहे. मध्यप्रदेशात या नावाचे खेडे आहे. त्याचप्रमाणे हरिद्वार, उदयपूर, गोरखपूर, छतरपूर, मिर्झापूर, हस्तिनापूर, वृंदावन इत्यादी नावांची खेडीही आहेत.
‘लंगूर’, ‘मकोडा’, ‘अजगर’ अशा प्राण्यांच्या नावांची गावे तर ‘साला’, ‘साली’, ‘देवर’, ‘मौसी’ अशा नात्यांच्या नावांची गावे आहेत. त्याचप्रमाणे ‘कढई, ‘टोकरी’, ‘कटोरी’, ‘छुरी’ अशा स्वयंपाकघरातील वस्तूंच्या नावांची गावेही आहेत. भाज्यांच्या नावांची गावेही कमी नाहीत. ‘शिंगाडा’, ‘सोडा’, ‘लहसून’, ‘भजिया’, ‘हल्दी’, ‘करेला’ आणि ‘गुट्टी’ अशी नावे बघून मौज वाटल्याखेरीच राहात नाही. त्याचप्रमाणे ‘भिखारी’, ‘चाऊमाऊ’ अशी नावे पाहिली म्हणजे मध्यप्रदेशातील लोकांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्यावाचून आपण राहू शकत नाही.