शेतकऱ्यांमध्ये भीती, शेती पिकांचे नुकसान, बंदोबस्ताची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेकिनकेरे येथे शनिवारी भरदिवसा एका गवीरेड्याने धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावापासून जवळ असलेल्या शिवारात गवा दिवसा नजरेस पडल्याने शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरताना दिसत आहेत. कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी वनखात्याने गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
बेकिनकेरे-अगसगा मार्गावर गवा शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी झाडावर चढून बचाव केला. मात्र अद्याप गवा गावाजवळ असलेल्या काजूच्या बागेत दबा धरून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बेकिनकेरे, बसुर्ते, अतिवाड, कौलगे आदी डोंगर परिसरात गव्यांची संख्या वाढली आहे. कळपा-कळपांनी गव्यांचा संचार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. गावाजवळच असलेल्या शिवारात कळपातीलच एका गव्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जाणेदेखील धोक्याचे बनले आहे.
ऐन सुगी हंगामात गवीरेड्याने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे बटाटा, रताळी काढणीबरोबरच मळणी हंगामाची धांदल सुरू आहे. तर दुसरीकडे गावाजवळच गवीरेडा आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे वनखात्याने तातडीने गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बेकिनकेरे येथील डोंगरपायथ्याशी असलेल्या शिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान उभ्या पिकात वन्यप्राणी हैदोस घालत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. डोंगर भागात अन्न मिळत नसल्याने वन्यप्राणी गावाजवळ असलेल्या शिवारात उतरत आहेत. दरम्यान भात, ऊस, बिन्स, मिरची आदी पिकांचे नुकसान करत आहेत.
शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक
सकाळी शेताकडून परत येताना एका मोठ्या गव्याचे दर्शन झाले. गवा अगदी समोरच आल्याने भीतीने बचावासाठी झाडावर चढलो. गवा पुढे गेल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. गवा अद्याप काजूच्या बागेतच आहे. त्यामुळे शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना धोका पोहोचू शकतो. शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे.