वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘वंदे भारत’ या भारताच्या सर्वात वेगवान गाडीला सलग तिसऱया दिवशी अपघाताचा सामना करावा लागला आहे. शनिवारी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱया ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे चाक अचानक जाम झाल्याने गाडी थांबवावी लागली. त्यामुळे 1 हजार 68 प्रवाशांचा खोळंबा झाला. अखेरीस या प्रवाशांची सोय शताब्दी एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. चाक जाम होण्याबरोबरच ‘टायर फ्लॅट’ झाल्याचे दिसून आले. याची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी या गाडीचे इंजीन म्हशींच्या कळपावर आदळल्याने खराब झाले होते. दुसऱया दिवशी इंजिनाची गाईशी धडक झाली. तर तिसऱया दिवशी चाक जाम झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वेच्या भाषेत टायर फ्लॅट होणे याचा अर्थ चाकाचा व्यास बदलणे असा घेतला जातो. दिल्लीहून वाराणसीकडे जात असलेल्या या गाडीच्या सी-8 या डब्याची ट्रक्शन मोटर बिघडल्याने चाक जाम झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे. एक तासाच्या खोळंब्यानंतर जाम झालेले चाक काढण्यात येऊन नवे चाक बसविण्यात आले. तथापि, टायर फ्लॅटचा प्रकारही घडल्याने ही गाडी 20 किलोमीटरच्या वेगाने काही काळ धावली.
कोणत्याही रेल्वेच्या सुरक्षित वहनासाठी ट्रक्शन मोटर सुस्थितीत असणे आवश्यक असते. ट्रक्शन मोटरमुळे इंजिनाबरोबर डबा सुरळीतरीत्या पुढे जातो. वंदे भारत गाडीच्या ट्रक्शन मोटर्स भारतातच बनविण्यात आल्या आहेत. त्यांचा दर्जा उत्तम असून काही वेळा अपघाताने असे घडू शकते, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चाक जाम झाले तेव्हा गाडीचा वेग 100 किलोमीटर होता, असे दिसून आले. सविस्तर चौकशी लवकरच करण्यात येणार आहे.