अध्याय सविसावा
उर्वशीच्या नादाला लागून आयुष्य वाया गेल्याचे समजल्यावर पश्चाताप झालेला पुरुरवा राजा म्हणाला, माणसाने कितीही प्रयत्न केला तरी त्यांची मोहातून सहजासहजी सुटका व्हावी अशी परिस्थती नसल्याने, जोपर्यंत श्रीहरीची कृपा होणार नाही, तोपर्यंत कामाची चाल खुंटणार नाही. भक्तिभावाने श्रीहरीला शरण गेले असता हृदयस्थ नारायण प्रगट होतो. तेव्हा हृदयातील सारे काम आपोआप पळून जातात. उर्वशीच्या आसक्तीमुळे मी तर फारच कष्ट सोसले. पण त्यात तिचा काय अपराध? मीच मुळी श्रीहरीला विसरलो होतो. मी जर हरीचे स्मरण केले असते, तर बिचारा काम मला काय बाधणार होता? माझीच आठवण जर मला असती, तर उर्वशीची मला भुरळ न पडता ती मला अगदी तुच्छ वाटली असती. अंधाऱया जागेत गेल्यावर तेथे पडलेल्या दोरीचे स्वरूप न जाणल्याने तिच्याजागी सापाची कल्पना करून जो भयग्रस्त होतो, त्याला दोरी काय करणार! त्याप्रमाणे मला माझ्या स्वरूपाचा विसर पडल्याने माझे मनच माझ्या ताब्यात राहिले नाही, तर मी उर्वशीला का दोष द्यावा? मीसुद्धा इतका वेळ मूर्खपणाने उर्वशीचाच अपराध मानीत होतो परंतु नीट विचार करून पाहिला तेव्हा मीच सकाम व मतिमंद आहे अशी खात्री झाली. उर्वशी डोळय़ाला दिसताच मीच कामासक्त झालो आणि त्या माझ्याच लंपटपणामुळे अखेरीस मीच नागवलो गेलो. संध्याकाळच्या वेळी दोर दृष्टीस पडला असता भित्र्याला तो मोठा थोरला सापच भासतो, नीट न्याहाळून पाहिले नाही तोपर्यंत तो एक भयंकर अजगरच वाटतो. त्या सापाच्या भयाने घाईघाईने पळताना त्याच्या दोन्ही पायात त्या दोराची आढी पडते व सर्पानं वेटाळा घातला असे त्याला वाटते. त्याचीच कल्पना त्याला बाधते. माझ्या बाबतीत असेच झाले. माझ्या कामभ्रांतीने उर्वशी सुंदर स्त्री वाटली आणि माझ्याच कामासक्तीने मी रतीविलासात मग्न झालो. ह्याप्रमाणे मीच अविचारी प्राणी, त्या उर्वशीच्या कामाला लुब्ध झालो, असे असता तिच्यावर रागावलो हे केवळ अधर्म्य होय. स्त्री डोळय़ाने पाहिली की, विषयलंपट पुरुषाला ती अत्यंत रमणीय वाटते परंतु विचारी पुरुषाला तीच घाणेरडी व नरकाची खाण वाटते. परंतु विचारी लोक त्याच्याकडे पाहून थुंकतात. मनुष्य मोहात पडला की, वाईट गोष्टी त्याला चांगल्या वाटू लागतात. हर प्रयत्नाने त्या लाभल्या की, त्या कायमच्या आपल्या जवळ असाव्यात असे वाटू लागते. जशी उर्वशी कायम माझ्याजवळ रहावी असे मला वाटत होते पण माणसाचा इथेच त्याचा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश झाला की, आत्मनाश व्हायला कितीसा उशीर? माणसाचे शरीर माणसाला फार प्रिय असते परंतु खरं म्हणजे ते मलिन, दुर्गंधीने भरलेले अपवित्र असते परंतु मी अज्ञानाने वाइटाला चांगले मानले! स्त्री, पुरुष ही जी नावे आहेत, ती फक्त देहालाच आहेत. स्त्री आणि पुरुष यांच्यामधील आत्मा एकच आहे पण विषयी पुरुष स्त्रीच्या रुपाला व्यर्थ भुलतात. तात्पर्य, मायेचा तडाखा मोठा जबर आहे. मनुष्य म्हणत असतो की, हा देह माझा आहे परंतु त्यालाही आठ वाटेकरी असतात म्हणून हे शरीर कुणाच्या मालकीचे आहे हे ठरवणे मोठे अवघड आहे. हे शरीर मात्यापित्यांच्या मालकीचे की पत्नीच्या? हे मालकाचे की अग्नीचे की कुत्रीगिधाडांचे? हे आपले की बांधवांचे? खूप विचार केला तरी हे निश्चित ठरवता येत नाही पण हे एकटय़ाच्या मालकीचे नक्कीच नव्हे. म्हणून ‘माझा’ देह म्हणून ममता धरणे हेच खरोखर अधःपाताला नेणारे आहे. हे शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायू, मेद, मज्जा आणि हाडे यांचा समूह असून ते मलमूत्र व पुवाने भरलेले आहे. यामध्ये रममाण होणाऱया माणसात आणि किडय़ात अंतर कुठे राहिले? आता तुम्ही म्हणाल की, अविचारी मनुष्य स्त्रीच्या मोहाला बळी पडतो हे समजले पण जो विचारी आहे, त्याला स्त्रीसंगती काय करणार? तर बाबा! ह्या स्त्रीच्या संगतीच्या पायी मोठमोठय़ा ज्ञात्यांनीही आघात सोसले आहेत. त्याबद्दल सविस्तर सांगतो ऐक.
क्रमशः