दोन वर्षांपासून रेल्वेसेवा बंदच : प्रवासी विमान, बस वाहतुकीवर अवलंबून : त्वरित रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
हैद्राबाद शहराला रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना एक तर विमान अथवा बससेवेवर अवलंबून रहावे लागत आहे. हैद्राबाद शहराला ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या सर्वाधिक असतानाही मागील दोन वर्षांपासून रेल्वे बंद आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून या मार्गावर रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांची सोय होईलच; पण रेल्वेलाही महसूल मिळणार आहे.
कोरोनापूर्वी कोल्हापूर-तिरुपती या एक्स्प्रेसला जोडूनच कोल्हापूर-हैद्राबाद रेल्वे धावत होती. गुंडकल रेल्वेस्थानकापासून येथील काही डबे हैद्राबादला तर काही डबे तिरुपतीला जात होते. परंतु यामध्ये प्रवाशांची गफलत होत असल्याने नंतरच्या काळात दोन स्वतंत्र एक्स्प्रेस या दोन्ही शहरांना धावत होत्या. हैद्राबाद येथे अनेक आयटी कंपन्या असल्यामुळे बेळगाव, कोल्हापूर, गोवा या परिसरातील अनेक तरुण नोकरीसाठी हैद्राबाद येथे आहेत. या तरुणांना ये-जा करण्यासाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची ठरत होती. परंतु कोरोनाकाळात या एक्स्प्रेस बंद झाल्या.
दोन वर्षे उलटली तरी अद्याप या मार्गावर रेल्वे सुरू करण्यात आली नाही. यामुळे प्रवाशांना एक तर दोन ते अडीच हजार रुपये खर्च करून विमान अथवा पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च करून आराम बसने प्रवास करावा लागत आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी परवडणारा व सोयीचा असतो. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासाला प्रवाशांकडून पहिली मागणी असते. परंतु एक्स्प्रेसच उपलब्ध नसल्याने प्रवासी बेळगाववरून हुबळीपर्यंत प्रवास करून तेथून रेल्वेने हैद्राबादला जात आहेत.
हैद्राबाद रेल्वेची मागणी
बेळगाव परिसरातील अनेक युवक उच्चशिक्षित असून ते सध्या हैद्राबाद येथील अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत आहेत. या युवकांना ये-जा करण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे. वारंवार मागणी करूनही अद्याप नैर्त्रुत्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. काही तरुणांनी रेल्वेच्या वरि÷ अधिकाऱयांशी वारंवार पत्रव्यवहार करत ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे रेल्वेप्रशासन युवकांच्या या मागणीकडे लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.