अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, भोगासक्ती आहे तोवर ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलेले साधक भोगवासनांमुळे परत येतात पण ज्याला माझी भेट होते तो मला येऊन मिळत असल्याने ते परत येत नाही. ज्याची भोगाचीच इच्छा नाहीशी होते, त्याच्या चारही मुक्ती दासी होऊन राहतात. जे माझी भक्ती करतात त्या माझ्या भक्तांना निश्चितच माझी गती प्राप्त होते. ज्यांना माझी निष्काम भक्ती प्रिय असते, त्यांना माझी प्राप्ती होते.
सकाम भक्तांच्या वासना मी पूर्ण करतो. ह्यामागे उद्देश असा की, वासना कितीही पुरवल्या तरी त्यांची तृप्ती होत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि वासना करण्याचं सोडून द्यावं. अशा प्रकारे त्यांना मी निष्काम करत असतो. मी माझ्या भक्तांना आपणहून निजधामाला घेऊन जातो.
ज्या भक्तांना सलोकता आवडत असेल त्यांना वैकुंठात राहावयास घेऊन जातो. भक्ताने समीपता मागितली, तर मी त्याला आपला जिवलग मित्र करतो. भक्ताने सरूपता मागितली तर त्याला मी चतुर्भुज करतो आणि शंख-चक्रादिक आयुधे त्याला देऊन मेघाप्रमाणे सुंदर सावळा वर्ण देतो. त्याच्या डोक्मयावर माझ्याप्रमाणेच मुकुट असतो तसेच इतर आभूषणेही मी त्याला देतो. सरूपता जरी प्राप्त झाली, तरी हा एक देव आणि हा एक भक्त, असा भिन्नत्वाचा भेदभावाचा किंतु त्यांच्यामध्ये शिल्लक राहातोच. म्हणून भिन्नत्वाची भेदवार्ता सोडून भक्त सायुज्यताच मागतो. त्या सायुज्याची गोडी उद्धवा! मी तुला सर्व सविस्तर सांगेन. सरूपतेने देहाचा सारखेपणा प्राप्त झाला तरी हृदयामध्ये मीपणाचा भिन्नभाव असतो.
म्हणून अशा सरूपतामुक्तीलाही ज्ञाते भक्त लुब्ध होत नाहीत. माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊन माझे स्वतःसिद्ध भजन करावयाचे, ते सोडून माझे भक्त मनानेसुद्धा भेदाला शिवत नाहीत. देवासह भक्त हे अनादिसिद्ध आहेत. ते मूळचेच अभेदरूप आहेत. असे असता त्यात जो मुद्दाम भेद बाळगतो, तो भक्तिहीन व मायिक आहे असे समजावे. आर्त, जिज्ञासु आणि अर्थार्थी हे सर्व भेद मायिक भक्तीने केलेले आहेत, परंतु अभेदभावाने जे माझे भजन करतात, त्यांना सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. राजा आणि रंक हे ज्यांना सारखे, ज्यांचे मन अमुक वंद्य आणि अमुक निंद्य असा भेद मानीत नाही, जे देहाभिमान धरीत नाहीत, त्यांना सायुज्यता प्राप्त होते.
ज्याप्रमाणे आपली सावली मिथ्याच आपल्याला चिकटलेली असते, त्याप्रमाणेच जो ही देहबुद्धी मिथ्या समजतो, त्यालाच सायुज्यता प्राप्त होते. छाया ही आपल्याचपासून जन्मास येऊन आपल्याबरोबरच वाढते, तरी ती माझी आहे अशी तिच्याबद्दल आपुलकी, काही कोणाच्या मनात उत्पन्न होत नाही. अशाच प्रकारे देहाचे दुःख ज्याला बाधत नाही, त्याला निश्चितपणे सायुज्यता प्राप्त होते. देहाची विषयासक्ती सोडून जो मनोभावाने अभेदभक्ती करतो, त्यालाच उद्धवा! सायुज्य मुक्ती प्राप्त होते, असे निश्चित समज. स्वतःच्या देहामध्ये ज्याला मीपणा उत्पन्न होत नाही, कोणत्याही प्राणिमात्रामध्ये जो तू पणा पाहात नाही. त्याला सर्वस्वी पूर्ण सायुज्यमुक्ती प्राप्त होते. उद्धवा! माझ्या आत्म्याचा जेवढा विस्तार आहे, तेवढीच त्याला आत्मप्रतीती असते. यामुळे त्यालाच सहज सायुज्य मुक्ती लाभते. त्याला आपला देह विष्णुस्वरूप व्हावा असा देहाभिमान मुळीच उत्पन्न होत नाही. त्याला विष्णूचा देह आणि आपला देह हे दोन्ही मिथ्या असेच वाटत असते. म्हणून तो सरूपतेची इच्छा करीत नाही.
आपल्याच ठिकाणी आपण विचार करून पाहिला असता देह म्हणून जितका आहे, तितका मिथ्या आहे असे वाटते. तेव्हा तेथे सारूप्यता राहिली कोठे? अर्थात् ज्ञात्यांनी ती कशी मागावी? सायुज्यता प्राप्त झाली की, ब्रह्माशिवाय रिकामी जागाच शिल्लक राहिलेली दिसत नाही. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी एकात्मता होणे, याचंच नांव खरोखर सायुज्यता होय.
क्रमशः