दुष्काळी भागाच्या विकासासाठी रेल्वेचे जाळे उपयुक्तः खासदारांकडून पाठपुराव्याची अपेक्षा
संजय गायकवाड/सांगली
सांगली, सातारा व सोलापूर जिह्यातील दुष्काळी भागाच्या विकासाची नांदी ठरणाऱया मिरज-सांगली ते बारामती-दौंड व कराड ते पंढरपूर या दोन नव्या रेल्वेमार्गाला गती देण्याची आवश्यकता आहे. प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहतूकीच्या दृष्टीने दोन्ही रेल्वेमार्ग अतिशय उपयुक्त व आवश्यक आहेत. नव्या रेल्वेमार्गाचे तातडीने सर्व्हेक्षण करण्यासाठी तिन्ही जिह्यातील खासदारांनी दिल्लीदरबारी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या 50 वर्षात पुण्याला रेल्वेमार्गाने जोडणारा कोल्हापूर-मिरज ते पुणे हा एकच रेल्वेमार्ग अस्तिवात आहे. सध्या पुणे ते मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पण, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर त्यावेळचा दक्षिण सातारा जिल्हा त्यानंतर सांगली जिह्याची निर्मिती व लागून असलेला सोलापूर या तीन जिह्याचा विचार केला. तर रेल्वेच्या बाबतीत दक्षिण महाराष्ट्रातील दुष्काळी भाग नेहमीच उपेक्षित राहिलेला आहे. त्यामुळे सांगली जिह्यातील तासगाव, विटा, कडेगाव, आटपाडी आदी तालुक्यांना मध्य रेल्वेच्या मिरज ते पुणे या रेल्वेमार्गावरच अवलंबून राहावे लागलेले आहे.
देशभरात रेल्वेचे नवे मार्ग, सर्वेक्षण, दुहेरीकरण व विद्युतीकरणाची कामे वेगाने सुरू असताना दक्षिण महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आजही रेल्वेच्या प्रतीक्षेतच राहिलेला आहे. सांगलीचे तत्कालिन खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सांगली जिह्यातील दुष्काळी भागाच्या विकासासाठी मिरज-सांगली ते बारामती व कराड ते पंढरपूर या दोन नव्या रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण करण्याची केंद्र सरकार व रेल्वेमंत्रालयाकडे मागणी केली होती. दरम्यानच्या काळात केंद्रात सत्तांतर झाले, लोकप्रतिनिधी बदलले. त्यामुळे ही मागणी मागे पडली.
सांगली ते बारामती व कराड ते पंढरपूर हे दोन्ही रेल्वेमार्ग सांगली, सातारा व सोलापूर जिह्याच्या विकासाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. सांगली ते बारामती हा रेल्वेमार्ग मिरज जंक्शनपासून सुरू होवून सांगली, माधवनगर, बुधगाव, कवलापूर, कुमठे, तासगाव, विटा, मायणी मार्गे बारामती व दौंड जंक्शनला जोडण्याचा प्रस्ताव आहे. तर दुसरा मार्ग कराडपासून सुरू होवून कडेगाव, विटा, लेंगरे, खरसुंडी, आटपाडी, दिघंची, महूद मार्गे पंढरपूरला जोडला जाईल, असे प्रतीक पाटील यांनी तयार केलेल्या निवेदनात नमूद केले होते.
सांगलीहून पुण्याला पर्यायी रेल्वेमार्ग उपलब्ध होणार
सांगली ते बारामती हा रेल्वेमार्ग सांगली जिह्यातील दुष्काळी भागाच्या विकासाला वरदान ठरणार आहे. या मार्गामुळे सध्याच्या मिरज ते पुणे या रेल्वेमार्गावरील मोठा भार कमी होण्यास मदत होईल. तसेच तासगाव विटा ही शहरे रेल्वेच्या नकाशावर येतील. तासगावातील द्राक्षे, बेदाणा पुण्याला जलदगतीने पाठविण्याची सोय उपलब्ध होईल. माधवनगर येथील कापड व्यवसायाला ऊर्जितावस्था येईल. सांगली ते बारामती हा सध्या रस्ते मार्ग उपलब्ध आहे. रस्ते मार्गाला रेल्वेमार्ग पूरक ठरेल. त्याचप्रमाणे कराड ते पंढरपूर या रेल्वेमार्गामुळे कडेगाव, विटा, आटपाडी हे तालुके रेल्वेमार्गाने जोडले जातील. सांगली व सोलापूर या जिह्याच्या विकासाचे आणखी एक दालन खुले होईल. पंढरपूरला विशेषतः आषाढी व कार्तिकी यात्रा आणि देशदर्शनाला जाणाऱया हजारो प्रवाशांनी आणखी एक रेल्वेमार्ग उपलब्ध होईल.
विटय़ाच्या गलाई बांधवाना ये-जा करण्यासाठी चांगली सोय उपलब्ध होईल. यासाठी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, कराडचे खासदार श्रीनिवास पाटील, माढय़ाचे खासदार रणजितसिंह नाईक -निबांळकर, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री या नात्याने सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, साताऱयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे , कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.