कायमस्वरुपी घरांसाठी धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना कायमस्वरुपी घरे देण्यात यावीत, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. मात्र याची दखल घेण्यात आली नसल्याने स्वच्छता कामगारांना धोकादायक इमारतीमध्ये राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या मागणीची पूर्तता कधी होणार? आणि धोकादायक इमारतींमधून स्वच्छता कामगार कधी बाहेर पडणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
स्वच्छता कामगारांमुळे शहरातील कचऱयाची उचल होत असते. पण स्वच्छता कामगारांच्या समस्या सोडविण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे कायमस्वरुपी घरांच्या मागणीचा मुद्दा धूळखात पडला आहे. पण या मागणीची पूर्तता झाली नसल्याने धोकादायक इमारतींमध्ये जीवन जगण्याची वेळ स्वच्छता कामगारांवर ओढविली आहे. या ठिकाणी कोणताही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आनंदवाडी येथे पी. के. क्वॉर्टर्समध्ये 175 हून अधिक स्वच्छता कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यापैकी एका इमारतीचे छत कोसळण्याच्या मार्गावर असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे 40 स्वच्छता कामगारांचे अन्यत्र स्थलांतर करून सदर इमारत भूसपाट करण्यात आली होती. त्याठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करून स्वच्छता कामगारांना घरे देण्यात येतील, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिले होते. मात्र याची पूर्तता मागील दोन वर्षांत झाली नाही.
या ठिकाणी आणखी दोन इमारती असून शंभरांहून अधिक स्वच्छता कामगार राहत असतात. या इमारतीच्या भिंती जीर्ण झाल्या असून छत कोसळण्याच्या मार्गावर आहे. मागीलवर्षी एका इमारतीचे पोर्च कोसळून लहान मुलगी आणि स्वच्छता कामगार जखमी झाले होते. त्यानंतर या इमारतीच्या पोर्चची दुरुस्ती करण्यात आली होती. पोर्चला लोखंडी पाईपच्या खांबांचा आधार देण्यात आला आहे. मात्र पहिल्या मजल्यावरील छत कोसळत असल्याने धोका कायम आहे. इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून धोकादायकस्थितीत इमारती उभा आहेत. कायमस्वरुपी घरांच्या मागणीची पूर्तता केली नसल्याने अशा धोकादायक स्थितीतील जीवघेण्या इमारतीमध्ये स्वच्छता कामगार रहात आहेत. कित्येक वर्षांपासून आंदोलन छेडूनही स्वच्छता कामगारांना कायमस्वरुपी घरे देण्यात आली नाहीत.
त्यामुळे ही समस्या जैसे थे आहे. या समस्येची तक्रार मुख्यमंत्र्यांसह कामगारमंत्री, नगरविकासमंत्री आणि सफाई कर्मचारी आयोगाकडेही करण्यात आली होती. पण याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी या इमारतीची अनेकवेळा पाहणी केली. कायमस्वरुपी घरांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. पण याची पूर्तता आजपर्यंत झालीच नाही. स्वच्छता कामगारांना कायमस्वरुपी घर कधी मिळणार? आणि धोकादायक इमारतीमधून स्वच्छता कामगार बाहेर कधी निघणार? असा मुद्दा उपस्थित होत असून स्वच्छता कामगारांच्या समस्येकडे लक्ष देऊन धोकादायक स्थितीतून बाहेर काढावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.