ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना सूरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली असून, त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. पण 2 वर्षाची शिक्षा झाल्याने लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या कारवाईचा देशभरात निषेध व्यक्त होत असून, पुण्यातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू यांच्याविरोधात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
‘अपना भिडू! बच्चू कडू’ सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रहारचे आ. बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आता त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? असा सवाल या बॅनरमधून विचारण्यात आला आहे. नियम सर्वांना सारखेच असले पाहिजेत. ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’, असा उल्लेख या बॅनरवर आहे.
नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून 2017 मध्ये प्रहार संघटनेने नाशिक महापालिकेवर आंदोलन केले होते. यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. त्यावेळी बच्चू कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला होता. या वादानंतर आयुक्त कृष्णा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1 वर्ष तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी 2 वर्षांची शिक्षा कडू यांना सुनावली आहे.
अधिक वाचा : LPG गॅस सिलिंडरवर मिळणार सबसिडी; केंद्राची घोषणा