चंदुर / राकेश पाटील :
हातकणंगले तालुक्यातील मौजे चंदुर येथील माळभागावरील संजीवनी विद्यामंदिर, चंदुर या जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारी विना कठडा असलेली विहीर धोकादायक स्थितीत आहे. गावातील नागरिकांनी व पालकांनी अनेक वेळा वारंवार तक्रार करूनही शाळेच्या व्यवस्थापकाने किंवा चंदुर ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या विहिरीमुळे पालकांना रोज आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यास यावे लागत आहे.
1972 च्या दुष्काळात खणण्यात आलेली विहीर ही अनेक वर्षापासून त्याच अवस्थेत आहे. या विहिरीमध्ये काही वर्षांपूर्वी एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला आहे. या गोष्टीची माहिती गावातील प्रशासनाला व नेतेमंडळींना असूनही ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांच्यातून केला जात आहे. त्याचबरोबर या पडक्या विहिरीमध्ये गटारीचे सांडपाणी सोडले जात आहे व वरून पावसाचे पाणी साचत आहे, त्यामुळे विहीर तुडुंब भरली आहे. त्याच्या शेजारूनच निमुळत्या रस्त्यावरून नागरिकांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही महिन्यापूर्वी या पडक्या विहिरीतील गाळ काढण्यावर हजारो रुपये खर्च केला आहे. पण त्या ऐवजी या विहिरीला सुरक्षा कठडा बांधण्याचा विचार ग्रामपंचायत व नेतेमंडळी का करत नाहीत, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
हेही वाचा : भारत-चीन सीमेवर BRO चे 18 मजूर बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला