प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वात जास्त महसूल देणारे कार्यालय म्हणून उपनोंदणी कार्यालयाकडे पाहिले जाते. पण त्या कार्यालयाची इमारत अजूनही जुनी व तोटकीच आहे. पूर्वीच्या ट्रेझरी कार्यालयामध्ये काही भाग सुरू करण्यात आले आहेत. मात्र या दोन्ही इमारती जुन्याच आहेत. पावसाळय़ामध्ये अनेक ठिकाणी गळती लागत आहे. तसेच या इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणाऱया नागरिकांना स्वच्छतागृह नाही, त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. तेंव्हा या दोन्ही इमारतींच्या ठिकाणी भव्य इमारत उभी करावी, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणी अडचण होत असते. त्यामुळे इमारतीचा कधी कायापालट होणार? असाच प्रश्न साऱयांना पडला आहे. कर्मचाऱयांबरोबर वकील, खरेदीदार व विवाह नोंदणी करून घेण्यासाठी आलेल्या नवदांपत्यांना व नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. ही इमारत तातडीने अत्याधुनिक पद्धतीने उभारावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेबरोबरच कर्मचाऱयांतून होत आहे.
उपनोंदणी कार्यालयामध्ये जमीन खरेदीचे व्यवहार, मॉडगेज प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, वारसाप्रमाणे जमीन नावावर करणे यासह इतर कामे या ठिकाणी केली जातात. यामधून मोठा महसूल सरकारला मिळतो. पण अधिक महसूल मिळणाऱया या कार्यालयाचीच अवस्था दयनीय झाली आहे. या कार्यालयामध्ये कर्मचाऱयांना बसण्यासाठी जागा नाही. त्यामध्येच नागरिकांची गर्दी. यामुळे काम करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची गरज
या कार्यालयामध्ये साक्षीदार तसेच इतर कामासाठी नागरिकांची आवश्यकता प्रत्येकाला भासते. त्यामुळे एका कामासाठी 10 ते 15 जण या कार्यालयात उपस्थित असतात. त्यामुळे साधे उभे राहण्यासाठीही या ठिकाणी जागा उपलब्ध नसते. यामुळे एकमेकाला धक्का देऊन पुढे जावे लागत आहे. याचबरोबर एका कामासाठी तासन्तास थांबावे लागते. या सर्व प्रकारामुळे या कार्यालयात नेहमीच गर्दी दिसून येत आहे. तेंव्हा जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या विभागासाठी अत्याधुनिक इमारतीची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपली कामे करून घेण्यास मदत होणार आहे. अधिक धावपळ न करता कामे पूर्ण होऊ शकतात. तेंव्हा जुनी ट्रेझरी व नोंदणी कार्यालय तसेच इतर कार्यालयांच्या इमारती पाडवून पुन्हा अत्याधुनिक अशी इमारत उभी केल्यास निश्चितच त्याचा साऱयांनाच फायदा होणार आहे. याबाबत यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱयांनी अहवालही तयार करून सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र अजूनही त्याबाबत गांभीर्य घेण्यात आले नाही. तेंव्हा नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.
चौकट
दोन्ही विभाग एकाच ठिकाणी सुरू करा
सध्या या ठिकाणी उत्तर विभागाचे काम सुरू आहे. दक्षिण विभागाच्या कामासाठी इतरत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यामुळे वकिलांना तसेच खरेदीदार व विक्रीदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भव्य इमारत उभी करून दोन्ही विभाग याच ठिकाणी सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.