शहरातील बहुतेक ग्रामीण बसथांब्यांवरील चित्र : वडाप-खासगी वाहनांवर आवर घालण्याची नितांत आवश्यकता
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर आणि परिसरात धोकादायक वडाप वाहतूक वाढीस लागली आहे. खासगी वाहनांतून लेंबकळत होणारा प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कारवाईसत्र गतिमान होण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रभावीपणे कारवाई केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही धोकादायक वाहतूक थांबविण्याची गरज आहे.
शहरांतर्गत तसेच बाहेरील गावांना ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेबरोबरच खासगी प्रवासी वाहनांचा वापरही मोठय़ा प्रमाणात होत आहे. शहरांतर्गत भागात ही वाहतूक अनधिकृत असूनही मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. याचबरोबरीने शहरातून ग्रामीण भागातील प्रवाशांची
ने-आण करण्यासाठी खासगी वाहने मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होवू लागली आहेत. प्रवासी भरणा करून घेण्यासंदर्भात कोणतेही नियम न पाळता अक्षरशः प्रवाशांना केंबण्यात येत आहे. पावसाळय़ाच्या तोंडावर हे प्रकार न थांबल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दरम्यान, सायंकाळी 5 नंतर शाळा सुटली की, प्रत्येक बस थांब्यावर विद्यार्थ्यांची गर्दी होते. दरम्यान बस पकडण्यासाठी व लवकरात लवकर घरी जाण्यासाठीही विद्यार्थी अक्षरशः बसमध्ये लोंबकळतात. त्यामुळे त्यांच्याही जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे बसफेऱयांत वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा परिवहन महामंडळाने याची दखल घ्यावी, असेही सांगण्यात येत आहे.
प्रशासनानेच जागे होणे आवश्यक
बेळगाव शहराच्या उत्तर व पश्चिमेकडील भागात जाण्यासाठी प्रवाशी टेम्पो बस सेवेपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध होवू लागले आहेत. 20 ते 25 इतकीच क्षमता असताना 50 ते 55 प्रवाशांना घेतले जात आहे. प्रवाशांना कधी अक्षरशः कोंबून, कधी दारावर लटकवून तर कधी टपावर बसवूनही प्रवास सुरू असतो. खडकाळ रस्त्यावरून खासगी माध्यमांची अक्षरशः स्पर्धा सुरू असते. अशावेळी एखादी दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानेच जागे होणे आवश्यक ठरत आहे.
पर्यायी व्यवस्था म्हणून वडाप वाहनांकडे आकर्षित
शहरांतर्गत भागात सेवा बजावणाऱया वडाप चालकांनी अक्षरशः प्रवाशांना कोंबून भरण्यास प्रारंभ केला आहे. बसच्या प्रतीक्षेत थांबण्यापेक्षा पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिक वडाप वाहनांकडे आकर्षित होत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. रहदारी पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.