आमदार विजय सरदेसाई यांचा सवाल : मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
गोव्याच्या खाणींत फक्त 260 दशलक्ष टन खनिज शिल्लक आहे, या वृत्तावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्त करताना 1.74 अब्ज टन खनिज कुठे गेले, असा सवाल केला आहे. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
विजय सरदेसाई यांनी 2013 साली गोव्यातील खनिज साठय़ांसंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारला असता तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2 अब्ज टन खनिजसाठा खाणींत बाकी असल्याचे उत्तर दिले होते. आयबीएमनेही त्यावेळी 1.1 अब्ज टन खनिजसाठा बाकी असल्याचे नमूद केले होते.
पर्रीकरांच्या अंदाजाकडे वेधले लक्ष
ऑक्टोबर, 2013 मध्ये गोव्यात 45 टन खनिज काढण्याची मर्यादा घातली होती. त्यापैकी 25 टन हे साठवून ठेवलेल्या खनिजसाठय़ातील असेल असे स्पष्ट केले होते. गोव्यात असलेला खनिजसाठा पुढच्या 50 ते 100 वर्षांसाठी पुरेल असा अंदाज त्यावेळी पर्रीकर यांनी व्यक्त केला होता, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे. पर्रीकर यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने खनिज उत्खननाची मर्यादा पाळली नसल्याने येत्या 10 वर्षांत खनिजसाठा संपणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड लॉकडाऊनच्या वेळी सरकारने ई-ऑक्शनच्या नावाखाली पाहिजे तेवढे खनिज उत्खनन करण्याची मोकळीक दिली आणि वारेमाप खनिज विकण्यास मुभा दिली, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. गोव्यातील खनिजसाठा खरेच एवढा कमी झाला आहे की, आपल्या मर्जीतील भांडवलदारांना फायदा व्हावा म्हणून मुद्दामहून तो कमी दाखविण्यात आला आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.