काँग्रेस रोडवर केवळ खांबांची उभारणी : वर्ष उलटले तरी दिव्यांचा पत्ता नाही : काँग्रेस रोडची दुरवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
काँग्रेस रोडच्या रस्त्याचे रुंदीकरण करून चार वर्षे उलटली तरी येथील पथदीप खांबांवर दिवे बसविण्यात आले नाहीत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुभाजकांवर केवळ पथदीप खांब उभारण्यात आले आहेत. मात्र, दिव्यांचा पत्ता नसल्याने स्मार्ट सिटीअंतर्गत मंजूर झालेला निधी गेला कुठे? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरात राबविण्यात आलेली स्मार्ट सिटी योजना म्हणजे केवळ दिखाऊपणा असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात आलेली विकासकामे दर्जेदार नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. आता विनादिव्यांच्या पथदीप खांबांची उभारणी करून स्मार्ट सिटी कंपनीने आपली जबाबदारी झटकली असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, काँग्रेस रोडची दुरवस्था झाल्याने तसेच हा रस्ता महत्त्वाचा आणि वर्दळीचा असल्याने रस्त्याच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात आले.
बसविलेले दिवे काही दिवसांतच बंद
तिसऱया रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी खानापूर रोडवरील वाहतूक बंद केल्यास काँग्रेस रोडवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्मयता होती. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण तातडीने करण्यात आले. त्यानंतर इतर कामे पूर्ण करण्यात आली. रस्त्याशेजारी डेकोरेटिव्ह दिवे आणि दुभाजकावर नवीन पथदीप बसविण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली होती. अलीकडेच रस्त्याशेजारी फुटपाथवर डेकोरेटिव्ह दिवे बसविण्यात आले आहेत. पण काही दिवसांतच हे दिवे बंद झाले. दुभाजकाचे काम पूर्ण झाल्यानंतर पथदीप बसविण्यासाठी खांबांची उभारणी करण्यात आली होती. पण वर्ष उलटले तरी त्या खांबांवर दिवे बसविण्यात आले नाहीत. मात्र, जुन्या दिव्यांचा आधार घेतला जात आहे. बसविण्यात आलेले पथदीप खांब जुने झाले तरी पथदीपांचा पत्ता नाही. त्यामुळे पथदीपांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी गेला कुठे? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.