बिबटय़ाचा थांगपत्ता नाही, परिसरातील शाळा कधी सुरू होणार? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
आधुनिक कॅमेरे, मुधोळ श्वान, प्रशिक्षित हत्ती आणि शेकडो कर्मचाऱयांच्या माध्यमातून राबविलेल्या बिबटय़ा शोधमोहिमेला यश आले नाही. 29 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आता शोधमोहीम काहीशी थंडावली आहे. मात्र बिबटय़ा अखेर गेला कुठे? हा प्रश्न सर्व शहरवासियांना पडला आहे. मागील दोन दिवसांत बिबटय़ाबाबत कोणताही पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे तो नैसर्गिक अधिवासात गेला की अद्याप रेसकोर्स परिसरातच आहे? याबाबत संभ्रम कायम आहे.
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एकावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. तेव्हापासून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. दरम्यान दोन-तीन वेळा बिबटय़ा नजरेला पडला होता. तर एकदा वनखात्याच्या हातातून अलगद निसटला होता. बिबटय़ाला पकडण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. शिवाय शोधमोहिमेसाठी आधुनिक तंत्राचा वापर केला होता. मात्र निष्पन्न काहीच झाले नाही. त्यामुळे या शोधमोहिमेसाठी खर्च केलेला निधी देखील वाया गेला आहे.
रेसकोर्स परिसरात आता बिबटय़ाचा एकही पुरावा हाती लागला नाही. दरम्यान गुरुवारी मंडोळीत बिबटय़ासदृश प्राणी नजरेला पडला आहे. त्यामुळे हा रेसकोर्स परिसरातील बिबटय़ा आहे का? याबाबतही शंका व्यक्त होत आहे. यापूर्वी बिजगर्णी व बेळवट्टीत बिबटय़ाचे दर्शन झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे हा एकच बिबटय़ा फिरत असेल का? याबाबतही संभ्रम आहे. एकीकडे रेसकोर्स परिसरातील बिबटय़ाबाबत कोणताही सुगावा लागला नाही तर दुसरीकडे मंडोळीत बिबटय़ासदृश प्राणी निदर्शनास आल्याने वनखात्यासमोर डोकेदुखी वाढली आहे. शिवाय वेगवेगळय़ा ठिकाणी आढळणारा बिबटय़ा एकच आहे का? हा प्रश्नही सतावू लागला आहे.
29 दिवसांच्या कालावधीनंतरदेखील अखेर बिबटय़ा कोठे गेला? हे स्पष्ट झाले नाही. वन्यप्राणी हे आपला नैसर्गिक अधिवास सोडून एका ठिकाणी जास्त काळ राहत नाहीत. त्यामुळे बिबटय़ाही आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात गेला असावा, असा अंदाज वन्यप्रेमींतून व्यक्त होत आहे.
शाळांचे काय?
बिबटय़ाच्या दहशतीमुळे मागील 20-25 दिवसांपासून परिसरातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. मात्र अद्याप बिबटय़ाचा शोध लागला नाही. शिवाय बिबटय़ा अखेर कुठे गेला आहे? याबाबत कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे बिबटय़ा अखेर गेला कुठे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. या सगळय़ामुळे विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय शाळा कधी सुरू करणार? असा प्रश्नदेखील आता उपस्थित होऊ लागला आहे.