गोवा म्हटले म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देणारे राज्य. या राज्यात सध्या व्यसनाधीन पिढी निर्माण होत आहे, ही निश्चितच धोक्याची बाब आहे. शांतताप्रिय तथा संस्कृतीप्रधान गोवा राज्यात आज अमलीपदार्थांचे पेव फुटले असून युवापिढीच्या भवितव्याचा प्रश्न आ।़वासून उभा राहिला आहे. ज्याप्रमाणे गोंयकाराच्या खिशात दारूचे क्वाटर्स आढळावे, त्याप्रमाणे आज अमलीपदार्थ पाचवीलाच पूजला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गोव्यातील अर्थकारण आज अमलीपदार्थांच्या जोरावर चालत आहे का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.
सध्या गोवा विधानसभेचे अधिवेशन चालू असून प्रारंभीच्या सत्रात अमलीपदार्थांच्या विषयावर गंभीरपणे चर्चा झाली. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात ‘नशामुक्त गोवा’ असा उल्लेख केला. तोच विषय पकडून विरोधकांनी राज्यात ड्रग्ज व्यवहाराचे जाळे विणल्याचे नमूद केले. विरोधी आमदार दिगंबर कामत, युरी आलेमाव, मायकल लोबो, विजय सरदेसाई यांनी, कुठे आहे नशामुक्त गोवा, असा सवाल करून राज्यपालांच्या वक्तव्यावर उपहास व्यक्त केला. राज्यात अमलीपदार्थांचे जाळे विस्तारले आहे. अमलीपदार्थ विक्री व्यवहाराच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे खरोखरच गोवा सुरक्षित ठरला आहे काय, असा सवाल आमदार युरी आलेमाव यांनी विधानसभेत उपस्थित केला. अमलीपदार्थ विक्री व्यवहार थांबविण्यासाठी विशेष पथक नेमण्याची गरज असल्याचे आमदार मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. या व्यवहारात अल्पवयीन मुलांचाही वापर होत असून पोलीस अमलीपदार्थ विक्री करणाऱयांना सोडून देतात व खरेदी करणाऱयांना पकडतात, हेही त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.
अमलीपदार्थांचा सुळसुळाट हा आता फक्त समुद्रकिनाऱयांवर किंवा पर्यटन स्थळांपुरताच मर्यादित राहिला नसून संपूर्ण गोव्यात त्याने आपले जाळे विणले आहे. गोव्यातील ग्रामीण भागातही अमलीपदार्थ पोहोचला आहे. गोव्यातील विद्यालये, महाविद्यालयांमध्ये अमलीपदार्थ पोहोचला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्येही गांजा आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. हे लोण आता वैद्यकीय क्षेत्रातही पोहोचल्याने ही मोठी गंभीर बाब म्हणावी लागेल. शाळा-कॉलेज परिसरात अमलीपदार्थ मिळणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱया कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातही सापडणाऱया ड्रग्जमुळे कारागृहातील एकूण सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुंपणानेच शेत खाण्याचे प्रकार कारागृहात घडू लागले आहेत.
गोवा राज्याला सुंदर सोबित राज्य (भांगराळे गोंय) म्हणून उपमा दिली जाते. शांतताप्रिय तथा संस्कृतीप्रधान गोवा राज्यात अमलीपदार्थांचे पेव फुटले असून युवापिढीच्या भवितव्याचा प्रश्न आ।़वासून उभा राहिला आहे. आज अमूक-अमूक रकमेचा अमलीपदार्थ जप्त केला, अशा आशयाच्या बातम्या वारंवार झळकत आहेत. यात केवळ परप्रांतीयांना अटक होते मात्र मुख्य धेंडय़ांपर्यंत पोलीस यंत्रणा कशी काय पोहोचत नाही, हे एक आश्चर्यच आहे. गोव्याचे नाव अमलीपदार्थांच्या व्यवहारासाठी बदनाम होत आहे. गोव्यातील राजकारण्यांनी, पोलिसांनी यावर प्रतिबंधक उपाय योजणे आवश्यक ठरते.
गोव्यातील रस्त्यांवर अथवा निर्जनस्थळांवर, माळरानावर रात्रीच्यावेळी पाटर्य़ा चालतात. पोलिसांची नजर चुकवून रात्रभर धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेने कडक पावले उचलणे आवश्यक आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्या, गुटखा पाकिटे, सिगारेट्सची थोटूके आदी साहित्य सापडते. अमलीपदार्थ सेवनाचे प्रकारही घडत असतात. पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त घालून धिंगाणा घालणाऱयांना आवर घालण्याची गरज आहे. पावसाळी मोसम असला तरी हे प्रकार थांबलेले नाहीत. दारूच्या रिकाम्या बाटल्या म्हणजे अनैतिक कृत्यांचे दाखले आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
आज राज्यात सर्वत्र ड्रग्ज व्यवसाय झपाटय़ाने पसरत आहे. याला मूळ कारण म्हणजे झटपट पैसे कमविणे. दुसरे कारण म्हणजे आज ड्रग्ज सेवन करणे तरुणाईसाठी एक फॅशन बनली आहे. कॉलेज वयात आला की, आजचा विद्यार्थी या ड्रग्जच्या विळख्यात अडकतो. गोव्यातील समुद्रकिनारी भागातून या ड्रग्ज व्यवसायाला सुरुवात झाली. या धंद्यात अफाट अन् झटपट पैसे मिळू लागल्यामुळे हा धंदा तेजीत चालू लागला. युवावर्ग साहजिकच याच्या व्यवसायात आणि सेवनाकडे आकर्षित होऊ लागला. त्यानंतर हे लोण हळूहळू कॉलेज विद्यार्थ्यांकडून गावागावात वाडय़ावाडय़ावर पोहोचले. आज ठिकठिकाणी युवक खुलेआम ड्रग्ज सेवन करताना दिसतात. या वाईटवृत्तीला पूर्णविराम द्यायचा असेल तर पालकांनी मुलांना समज देण्याची नितांत गरज आहे आणि पोलिसांकडूनही कडक कारवाई झाली पाहिजे. गोव्यात अमलीपदार्थ व्यवहार नेमका कुणाच्या आशीर्वादाने चालतो यासंदर्भात गोमंतकीय जनता अनभिज्ञ आहे. पोलीस आणि ड्रग्ज माफियांमधील संबंधाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करणे आवश्यक आहे.
मौज-मजेसाठी ड्रग्ज, असे एक आत्मघातकी समीकरण काही वर्षांपासून राज्यात रूढ होतंय. ही नशा जगण्याची दशा करू शकते, याची पूरेपूर जाणीव असताही अनेक तरुण यामध्ये का आणि कसे गुरफटतात, याचे चिंतन होणे आवश्यक आहे. आज विदेशी पर्यटकांपेक्षा स्थानिक युवकांमध्ये ड्रग्जबद्दल क्रेझ निर्माण झाली असल्याने हे चित्र भविष्याच्यादृष्टीने भयावह आहे.