अनेक संस्थांना जमिनी देण्याचे प्रकार महागात : ग्राम पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष : पूर्ण 32 एकर जमीन गायब : गावच्या धार्मिक कार्यांसाठी आमराई वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे
वार्ताहर / कडोली
व्हॅक्सिन डेपो जसे बेळगाव शहराचे ऑक्सिजन आहे तसेच कडोली येथील आमराई गावासाठी ऑक्सिजन देणारे केंद्रच आहे. मात्र, आमराईमध्ये विविध संस्था, संघ, सरकारी कार्यालयांना जागा देऊन येथील नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. एकूण 32 एकर आमराईपैकी ग्राम पंचायतीकडे काहीच जमीन शिल्लक राहिली नाही. गावातील सांस्कृतिक कार्यक्रम व पशु आरोग्य केंद्राला जागा देण्यासाठीही जमीन नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातही अनेक उपक्रम राबविण्याचा घाट घालण्यात आला आहे. परिणामी शेतकऱ्यांना वरदान ठरणारी आमराई आता अनेक विस्थापितांमुळे शाप ठरणार, यात शंका नाही. त्यामुळे आताच यासाठी पाऊल उचलणे काळाची गरज आहे. नाही तर येणाऱ्या पिढीला येथे आमराई होती, असेच सांगावे लागणार की काय? अशी भीती ग्रामस्थांना लागून राहिली आहे.
कडोली गावाला निसर्ग सानिध्याची सावली म्हणून लाभलेली आणि अनेक संकटांशी दोन हात करून राखून ठेवलेल्या सुमारे 32 एकर आमराईतील जमिनीवर आता विविध संस्था मोजमापअभावी हातपाय पसरत चालल्या असून शेतकऱ्यांसाठी वरदान असणारे आमराई पशु आरोग्य केंद्र जागेअभावी दुसऱ्या गावाला हलविणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील ग्रा. पं. आणि लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसल्याने गावकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कडोलीच्या पश्चिमेला सुमारे 32 एकर आमराई आंबा, काजूच्या शेकडो झाडांनी नटलेली आहे. पूर्वी बेंगळूर दरबारी विविध समस्यांना तोंड देऊन सदर आमराई ग्रा. पं. च्या कब्जात ठेवली होती. ग्रा. पं. ने हायस्कूल, प्राथमिक शाळा, पशु संगोपन केंद्र, महिला मंडळ, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 13 ते 14 एकर जमिनीची नोंद केली होती. पण 8 ते 10 वर्षांपूर्वी यामध्ये बदल करून श्र्री शिवाजी हायस्कूलसाठी आणि कˆड सरकारी हायस्कूलसाठी स्वतंत्र 5-5 एकर जमीन देऊ केली. शिवाय बीएसएनएल कंपनीला एक एकर जमीन दिली आहे. उरलेली सर्व जमीन मिनी स्टेडियम उभारणीसाठी देऊ केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांसाठी ‘वाटी तो बोटे चाटी’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.
देवस्थान पंच दारोदारी
सदर 32 एकर आमराईतील जमीन संस्थांच्या नावे केली असून गावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी काही एकर जमीन ठेवणे गरजेचे होते. पण त्यावेळच्या ग्रा. पं. सदस्यांनी कोणताही विचार न करता संपूर्ण आमराईची विल्हेवाट लावली. गावच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यासाठी जमीन मिळावी यासाठी देवस्थान पंच कमिटी आता शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत आहे. पुढारी-नेत्यांना निवेदने देत आहेत. ग्रा. पं. आणि ग्रामस्थांनी याबद्दल आवाज उठविला तर सर्व काही होऊ शकते. परंतु ग्रा. पं. याकडे कानाडोळा करीत असल्याने ग्रामस्थ आणि देवस्थान पंच काय करणार? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीएसएनएलला जागा देणे योग्य?
ग्रा.पं.ने भारतीय संचार निगमला दिलेल्या एक एकर जमिनीवर सुसज्ज इमारत, टॉवर उभारले आहे. सदर इमारतीत 4-5 वर्षे कामकाज चालू होते. आता कार्यालय ओस पडले आहे. झाडाझुडपांनी संपूर्ण परिसर आच्छादून गेला आहे. शिवाय टॉवरही कधी सुरू कधी बंद अशीच अवस्था आहे. परिसरातील बीएसएनएलचे ग्राहक वारंवार सर्व्हर डाऊनची शिकार होतात. या कार्यालयासह संपूर्ण जागा ओस पडली आहे. तेव्हा या खात्याला जमीन देऊन काय साध्य करण्यात आले? गावासाठी कोणता लाभ झाला? असे प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केले जात आहेत.
पशू आरोग्य केंद्र हलविणार?
सदर आमराईत जमीन देऊ केलेल्या विविध संस्थांना ग्रा. पं. ने जमिनीचे मोजमाप करून दिलेले नाही. त्यामुळे काही संस्था हात-पाय पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकतीच प्राथमिक शाळेच्यावतीने पाच एकर जमिनीसाठी अंदाजे मोजमाप केले असता या पाच एकरमध्ये पशु आरोग्य केंद्राची इमारतही जाऊ पाहत आहे, हे निदर्शनास आले. असे असताना शासनाच्यावतीने मंजूर झालेली पशु आरोग्य केंद्राची इमारत कोठे बांधावी, असा पेच पडला आहे.
तेव्हा सदर पशु आरोग्य केंद्रच दुसऱ्या गावाला हलवावे की काय? अशा हालचाली संबंधित खात्याकडून सुरू असून ग्रा. पं. मात्र स्वस्थ बसली आहे. एवढ्या मोठ्या कृषिप्रधान गावातील पशु आरोग्य केंद्र बाहेर गेले तर गावचे फार मोठे नुकसान होणार आहे. या पशु आरोग्य केंद्रामुळे कडोलीतील धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसह शेतकऱ्यांच्या हजारो जनावरांचे आरोग्य अबाधित राहील का? याचा विचार होणे गरजेचे आहे. तेव्हा ग्रा. पं. ने वेळीच लक्ष देऊन आमराईतील जागा विविध संस्थांना मोजमाप करून हद्द करून द्यावी. गावच्या धार्मिक कार्यासाठी जागेचे नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
इमारतीपुरती जागा देणे गरजेचे
विविध शाळा तसेच सरकारी कार्यालयांना जागा देऊन आता केवळ आमराई ही नावापुरती उरली आहे. त्यामुळे आज ना उद्या गावकऱ्यांना आमराई गेली कोठे? असेच म्हणावे लागेल. संबंधित संस्थांना इमारतीपुरती जागा देऊन आमराईतील जागा वापरण्यास दिली गेली असती तर आज बरीच आमराई शिल्लक राहिली असती. एवढे होऊनही अनेक संस्थांना आमराईमधील जमीन देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान, गावातील तऊणांनी खेळायचे कोठे? हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. याबाबत ग्रा. पं. ने स्वतंत्र बैठक घेऊन आमराई वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.