प्रतिनिधी/ सातारा
एनआयएसह एजन्सींना छापे मारण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनी मारलेल्या छाप्यामध्ये काय काय आढळून आले. त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. मात्र त्यांनी ओबीसी समाज हा मुस्लिम धर्मात परिवर्तन करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगितले आहे. मी ओबीसी समाजात वावरतो. मी त्यांना विचारतो तुम्हाला अन्य धर्मात परिवर्तन करायचे आहे का? तर 80 टक्के त्यास नकार देतात. त्यावरुन एनआयएने नेमका कोठून लावला, अशी जोरदार टीप्पणी सध्याच्या पीएफआयच्या छापेमारीवरुन एनआयएवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशा सर्वच पक्षासह निवडणूक आयोगावर जोरदार टीप्पणी केली.
साताऱयात वंचित बहुजन आघाडीच्या संवाद मेळाव्यानिमित्ताने ते आले होते. ते शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, सुप्रिम कोर्टाचा निर्णय आला आणि अनेक मुद्दे अनुत्तरीत आहेत. हाच निर्णय द्यायचा होता तर एवढे दिवस का लावले. दुसरा भाग हा आहे की हे शासन स्टे ऑडर्रवर चालले आहे. जी स्थगिती दिली आहे त्याच्या संदर्भात जजमेंट आलेले नाही. कळीचा मुद्दा हा आहे की राज्यपाल निर्णय घेऊ शकतात का?, हा घटनात्मक प्रश्न आहे. आज निवडणूक आयोग एक प्रकारची बजबजुरी झाली आहे. कणा नसलेल्या माणसाला संविधानिक पदावर बसवले आहे. त्यांना कोणताही धाक नाही. त्यामुळे मनमानी कारभार सुरु आहे. जी काही घटना करण्यात आली आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले नवीन सभागृह हे जूनं सभागृह संपण्याच्या अगोदर गठीत झाले पाहिजे. म्हणून नवीन प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. मोदींचे सरकार कोणताही निर्णय घेत नाही. अचानकपणे प्रचंड मोठा निधी आल्यासारखे महाराष्ट्र सरकार घोषणा करते. घोषणाबाजीचे सरकार ठरते. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की नेमका किती निधी येतो. किती खर्च होतो, लोण फेडण्यासाठी किती जातो याचा खुलासा केला तर घोषित झालेले प्रकल्प पूर्ण होतील का नाही हे जनतेला समजेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही सरकार एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यातूनच खोक्याचे राजकारण बाहेर पडले. वेदांता प्रकल्पाची नेमकी काय आणि कधी बोलणी झाले हे स्पष्ट करावे, म्हणजे खरा प्रकार समजेल. परंतु ह्यांचे असे सुरु आहे की तू माझी पाठ खाजवायची नाही, मी तुझी खाजवणार नाही, असे सुरु आहे.
भारत तुटलाय कुठे?
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत छेडले असता ते म्हणाले, भारत तुटला आहे कुठे?, ते सांगावं. तुटला नाही तर जोडण्याचा प्रयत्न येतोच कुठे?, असे उत्तर दिले. काँग्रेससोबत समजोता करायला तयार आहोत. परंतु ते आमची अट मान्य करत नाहीत. त्यांच्याकडून ज्या चार चार वेळा हरलेल्या जागा आम्ही मागितल्या होत्या, दिल्या नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीला भीती वाटते की वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केले तर हे मोठे होतील. त्यांना आम्हालाच आयसोलेशनमध्ये ठेवायचे आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला ऑफर दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.